मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी प्रवीण परदेशींकडे सोपवली

मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी प्रवीण परदेशींकडे सोपवली

प्रवीण परदेशी

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यावर सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. केवळ राज्यातीलच नव्हे तर केरळ, भूज तसेच संयुक्त राष्ट्रातही नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनाचा अनुभव पाठीशी असल्याने परदेशी यांची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसला असून सुमारे पाच लाख लोक बेघर झाले आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्तांना संकटातून सावरण्यासोबतच त्यांचे पुनर्वसन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे राज्य प्रशासन, जिल्ह्यातील विविध विभाग, स्वयंसेवी संस्था यांच्याशी समन्वय साधून पुनर्वसनाचे हे मोठे काम मार्गी लावण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यावर सोपवली आहे.

प्रवीण परदेशी यांचा दांडगा अनुभव

गेली चार वर्षे मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव म्हणून आणि आता मुंबई महापालिका आयुक्त म्हणून काम करणाऱ्या परदेशी यांचा नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनाचा अनुभव आहे. लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना सन १९९३ मध्ये झालेल्या किल्लारी भूकंपानंतर तेथे पुनर्वसनाचे मोठे काम परदेशी यांनी केले होते. एवढेच नव्हे तर भूज भूकंप आणि केरळमध्ये आलेला महापूर यावेळीही आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसाची संपूर्ण जबाबदारी परदेशी यांनीच पेलली होती. संयुक्त राष्ट्रात आपत्ती निवारणाचे प्रमुख म्हणून सात वर्षे काम करताना परदेशी यांनी बांगलादेश, पाकिस्तानमधील भूकंप, इंडोनेशियातील सुनामीनंतर बाधित झालेल्या लोकांच्या पुनर्वसनाचा आराखडा आणि प्रत्यक्ष पुनर्वसनाचे काम मार्गी लावले होते.

First Published on: August 12, 2019 1:29 PM
Exit mobile version