आरबीआयचा कर्जदारांना मोठा झटका; गृह, वाहन कर्ज महागणार

आरबीआयचा कर्जदारांना मोठा झटका; गृह, वाहन कर्ज महागणार

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीने सर्वसामान्य आधीच त्रासला असताना आता रिझर्व्ह बँकेनेही मोठा झटका दिला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात तब्बल ०.४० टक्के वाढ करण्याची घोषणा बुधवारी केली. त्यामुळे गृहकर्ज आणि वाहनकर्ज महागणार आहे. तसेच विद्यमान कर्जदारांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे.

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी बुधवारी अचानक पत्रकार परिषद घेऊन रेपो दरात ०.४० टक्के वाढ करण्याची घोषणा केली. रेपो दर आता ४ टक्क्यांवरून ४.४० टक्के झाला आहे. रेपो दर वाढल्यामुळे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणारे कर्ज महाग होणार आहे. त्यामुळे बँका याचा भार आपल्या ग्राहकांवर टाकतील. परिणामी कर्जदारांना महाग दराने कर्ज मिळेल. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे शेअर बाजरातही मोठी पडझड झाली आहे. सेन्सेक्स 1000 अंकानी कोसळला. तर, निफ्टी 330 अंकानी कोसळला.

शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मार्च २०२२ मध्ये किरकोळ महागाई वाढून ७ टक्क्यांवर पोहोचली आहे.  अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे गव्हासह अनेक धान्यांच्या किमती वाढल्या आहेत. या युद्धाचा जागतिक पुरवठा साखळीवरही परिणाम झाला आहे.

रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट २०१८ नंतर  रेपो दरात वाढ केली आहे. साडेचार वर्ष रेपो दर स्थिर होता. त्यामुळे बँकांनीही आपले गृहकर्ज आणि वाहनकर्जाचे दर कमी केले. परिणामी कर्जाचे व्याजदर निचांकी पातळीवर आले. याचा मोठा फायदा कर्जधारकांना झाला.

रेपो रेट म्हणजे काय

रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून कर्ज घेते तो दर. रेपो रेट वाढला याचा अर्थ बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे असा होतो. तर रेपो रेट कमी झाल्यास बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणारे कर्ज स्वस्त होते.

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय

रिझर्व बँकही बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

First Published on: May 4, 2022 4:05 PM
Exit mobile version