सत्ताकेंद्र ‘मातोश्री’च, माजी मुख्यमंत्र्यांविषयी काही विचारू नका

सत्ताकेंद्र ‘मातोश्री’च, माजी मुख्यमंत्र्यांविषयी काही विचारू नका

शिवसेना खासदार संजय राऊत

माजी मुख्यमंत्र्यांबद्दल मला काही माहित नाही, बाळासाहेबांविषयी श्रद्धा असलेले नेते नेहमी इथे येऊन आदरांजली वाहत असतात, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. सत्तास्थापनेचे केंद्र दिल्लीला शिफ्ट होणार का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. ‘यापुढे सत्तास्थापनेचे आणि महाराष्ट्राच्या सत्तेचे केंद्र ‘मातोश्री’ असेल. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल तेव्हा सर्व गोष्टी समोर येतील, असे संजय राऊत यांनी सांगितले. राऊतांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते.

माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार मुंबईत नाहीत. ते सरकार स्थापनेसंदर्भात पुण्यात काही महत्त्वाच्या गाठीभेटी घेत आहेत. शरद पवार नेहमी बाळासाहेबांच्या जवळचे राहिले आहेत, त्यांनी नेहमी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे’ असे संजय राऊत म्हणाले. ‘बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होईल, जे आजवर झाले नाही ते सर्व महाराष्ट्रात होईल. क्रांती होईल, संपूर्ण महाराष्ट्रात भगवा फडकणार’ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. सत्तास्थापनेबद्दल बोलताना ‘कोणताही निर्णय थांबलेला नाही. निर्णयाचा क्षण जवळ येत आहे. महाराष्ट्रात आम्हाला स्थिर सरकार द्यायचे आहे. यावर आम्ही सगळे मिळून काम करत आहोत. किमान सामायिक कार्यक्रम जवळपास निश्चित झाला आहे. छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत, त्या आम्ही पूर्ण करु’ असे राऊतांनी स्पष्ट केले.

First Published on: November 18, 2019 2:03 AM
Exit mobile version