मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मनसेला सोबत घेणार का? अशी उलटसुलट चर्चा रंगलेली असतानाच आता या भेटीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली आहे. दोन हरलेले नेते एकत्र आले की, हरण्याचे दु:ख कमी होते, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. मनसेने नेहमीच काँग्रेसला बाहेरून मदत केली आहे. आता ते प्रत्यक्षपणे एकमेकांना मदत करतील यात दोघांचेही नुकसान असल्याचे मुनगंटीवार म्हणाले आहेत.
काय म्हणालेत नेमकं सुधीरभाऊ
काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. इन्सान मनसे हारता तो चुनाव भी हारता. यश अपयश आले तरी घाबरायचे नाही. जनतेची सेवा करायची असे अटलजींनी सांगितले आहे. मात्र काँग्रेसला सत्तेची चटत लागलेली असून, त्यांना सत्तेचा विरह सहन होत नाही. त्यामुळे काँग्रेस आता मनाने हरत आहे. दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वीच इव्हीएम वरील शंका दूर झाल्याचे सांगत. निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे – सोनिया गांधी भेट
तब्बल १४ वर्षांनंतर राज ठाकरें दिल्लीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन ईव्हीएम मशिनबद्दल अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. मात्र, त्यानंतर राज ठाकरेंनी अचानक काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले. विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरू होण्याआधीच नेमकी राज ठाकरेंनी ही भेट घेतल्यामुळे महाराष्ट्रासह दिल्लीतल्याही राजकीय वर्तुळात पक्षीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या. खासकरून १९७६मध्ये आणीबाणीच्या कालखंडात दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतल्यानंतर आज दुसऱ्यांदा ठाकरे-गांधी भेट घडली.