धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे वसईच्या पूर्वपट्टीतील मेढेपूल पाण्याखाली गेला असून 19 गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे 8 ते 10 हजार ग्रामस्थ प्रभावीत झाले आहेत. धरणक्षेत्रात चांगलाच पाऊस पडल्यामुळे तानसा धरण दुधडी भरून वाहू लागले आहे. त्यामुळे या धरणाचे 11 दरवाजे शनिवारी उघडण्यात आले. धरणाचे पाणी पूर्वपट्टीतील अनेक गावांमध्ये शिरले आहे. या गावांना जोडणारा मेढेपूल पाण्याखाली गेला असून वरठापाडा, नानकरपाडा, भिनार, बोडे, वडघर, कळंभोण, आडणे,लेंडीपाडा, मेढे, खैरपाडा, इमानपाडा, प्लॉटपाडा, चव्हाणपाडा, देवीपाडा, साकरापाडा, कातकरीपाडा, डोंगरी, गुजरपाडा या गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे 8 ते 10 हजार ग्रामस्थ प्रभावीत झाले आहेत. पूल बुडल्यामुळे एसटी सेवा बंद करण्यात आली असून विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजपासून दूर रहावे लागले आहे. तर आदिवासींचा रोजगार बुडाला आहे. भातशेतीही पाण्याखाली गेल्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ येणार आहे. एवढे मोठे संकट ओढावले असतानाही कोणताही अधिकारी या परिसरात फिरकला नसल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.