मुंबई पोलीस दलातील पोलीसाच्या दोन मुलांचा अपघातात जागीच मृत्यु

मुंबई पोलीस दलातील पोलीसाच्या दोन मुलांचा अपघातात जागीच मृत्यु

मुंबई पोलीस दलातील पोलीसाच्या दोन मुलांचा अपघातात जागीच मृत्यु

मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार असलेले अनिल गमरे यांच्या दोन मुलांचा अपघातात मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना नवी मुंबईतील पामबीच येथे रविवारी पहाटे घडली. याप्रकरणी एपीएमसी पोलीसांनी नवीमुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेल संचालकाच्या मुलाला या अपघाता प्रकरणी अटक सोमवारी अटक केली असून न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे. अपघातात दोन मुलाचा मृत्यू झाल्यामुळे गमरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलीस आरोपीचा बचाव करीत असल्याचा आरोप अपघातात मृत झालेल्या मुलांच्या नातेवाईकाने केला आहे.

अक्षय गमरे (२८) आणि संकेत गमरे (२४) असे अपघातात ठार झालेल्या पोलीस पुत्रांची नावे आहेत. अक्षय हा एका स्टॉक मार्केट कंपनीत मॅनेजर या पदावर नोकरीला होता तर संकेत याचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले होते. मुंबईत पोलीस दलाच्या टिळक नगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अनिल गमरे यांना तीन मुले असून त्यापैकी अक्षय हा मोठा मुलगा असून संकेत हा सर्वात लहान होता. नवीमुबईतील वाशीगाव येथे राहणारे अनिल गमरे यांचे मुलगे अक्षय आणि संकेत शनिवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास मित्राला भेटून दुचाकीवरून घरी परतत असताना पामबीच रोड येथे भरधाव वेगाने येणाऱ्या मर्सडिज या मोटारीने अक्षय आणि संकेत यांच्या दुचाकीला पाठगीमागून धडक दिली. या भीषण अपघातात अक्षय आणि संकेत या दोन्ही सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर मोटार चालक हा मोटार सोडून तेथून पळून गेला, अपघाताची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पूर्वतपासणीसाठी रुग्णलयात पाठवण्यात आले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरुन ताब्यात घेतलेली मर्सडिज या मोटारीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्यात आला असता आरोपी हा नवीमुंबईतील प्रसिद्ध एका पंचतारांकित हॉटेल संचालकांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी हॉटेल संचालक यांचा मुलगा रोहन अ‍ॅबोर्ट याला ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. रोहन हा मद्याच्या नशेत मोटार चालवत होता का याबाबत त्याच्या रक्ताच्या अहवालानंतर कळू शकेल अशी माहिती एपीएमसी पोलिसांनी दिली आहे. रोहनला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला जामिनावर सोडून दिले. अपघातात एकाच वेळी तरुण दोन मुलांना एकाचवेळी गमवावे लागल्यामुळे पोलीस हवालदार अनिल गमरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघात झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक न करता उशीरा अटक करून आरोपीला पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप गमरे कुटुंबीयांनी केला आहे.

First Published on: February 8, 2021 10:08 PM
Exit mobile version