अजितदादा ‘बिफोर’; अन्य नेते मात्र ‘लेट लतिफ’

अजितदादा ‘बिफोर’; अन्य नेते मात्र ‘लेट लतिफ’

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच्या शपथविधीनंतर राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वेळेबाबत आजही ‘राजकीय टायमिंग’ साधला जातोेे. नियोजित वेळेपेक्षा नेतेमंडळी उशिरानेच पोहोचत असल्याची अनुभूती पुन्हा एकदा नाशिकच्या विभागीय आयुक्तालयात बुधवारी (दि.१०) झालेल्या बैठकीत आली. यात उशिरा पोहोचलेल्या नेत्यांना अजित पवारांनी चांगल्याच ‘कानपिचक्या’ दिल्या. निर्धारित वेळेच्या अर्धा तास अगोदर पोहोचत अजित पवारांनी वेळेपूर्वीच सर्व बैठका संपवल्या.

राजकारणात अजूक ‘टायमिंग’ला खूप महत्व असते. तसेच नेत्यांच्या वेळेलाही तेवढीच किंमत आहे. परंतु, अनेक राजकीय मंडळी ही निर्धारित वेळच पाळत नसल्याची अनेक उदारहणे आहेत. उशिरा पोहोचत असल्याने नेत्यांची प्रतिमा मलिन होते. परंतु, बुधवारी नाशिकच्या विभागीय आयुक्तालयात अर्थसंकल्प आढावा बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी 9 वाजताच पोहोचले. त्यामुळे स्थानिक नेत्यांसह अधिकार्‍यांचिही चांगलिच तारांबळ उडाली. सर्वप्रथम नाशिक जिह्याची आढावा बैठक घेत त्यांनी अवघ्या तासाभरात ती संपवली. त्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांची आढावा बैठक त्यांनी दुपारी १२.३० वाजेपर्यंतच संपवली. यानंतर पत्रकार परिषद घेवून अजित पवार मुंबईकडे रवानाही झाले. दुपारी ३.३० वाजता मंत्रालयातील कॅबिनेट बैठकीलाही अजित पवार उपस्थित राहिले.

वेळेपूर्वीच बैठकीला हजर राहिलेल्या अजित पवारांच्या या अनपेक्षित धक्क्यामुळे अनेक नेत्यांना त्यांच्या पहाटेच्या शपथविधीची आठवणही होते. याविषयी अजित पवार नुकतेच म्हणाले होते की, आम्ही पहाटे वैगेरे काही शपथविधी केला नव्हता तर, जे लोक उशिरा उठतात, त्यांना तो पहाटे वाटला. पण सकाळी लवकर हा शपथविधी झाला होता, असे अजित पवारांनी मिष्किलपणे सांगितले होते. त्यांच्याप्रमाणे इतर नेतेही वेळ पाळतील अशी अपेक्षा करण्यास काहीच हरकत नाही.

First Published on: February 10, 2021 11:59 PM
Exit mobile version