जळगावचा पारा ४३.५ अंशावर

जळगावचा पारा ४३.५ अंशावर

जळगाव : राज्याच्या विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये उष्णतेचा कहर सुरूच आहे. मार्च महिन्यात दोन वेळा उष्णतेची लाट आल्याने एप्रिल महिन्यातही नागरिकांची उन्हाच्या तडाख्यापासून सुटका होणार नाही, असे चित्र आहे. जळगाव जिल्ह्यात उष्णतेची तीव्र स्वरूपाची लाट आली असून, आता 43.5 एवढ्या उच्च तापमानाची नोंद झाली.

गेल्या पंधरा दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. मात्र गेल्या दोन दिवसांत ही लाट तीव्र झाल्याने अनेकांनी दुपारच्या वेळात घराबाहेर पडण्याचे टाळले. एरवी भरदुपारी भरभरून वाहणारे रस्ते आता मात्र अघोषित संचारबंदीसारखी निर्मनुष्य परिस्थिती झाल्याचे चित्र आहे. ज्या नागरिकांना अतिशय महत्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडावे लागते, ते नागरिक उन्हापासून बचाव करणार्‍या उपाययोजना करून बाहेर पडत आहेत.

उन्हापासून बचाव करण्यासाठी काहींनी शीतपेय तर काहींनी ऊसाचा रस पिण्यासाठी गर्दी केल्याचे दिसत आहे. वाढत्या उन्हामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वी एकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. सध्या आलेली उन्हाची लाट आणखी काही दिवस अशीच कायम राहिल्यास उष्माघाताच्या बळींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्यात पारा ४२ अंशांवर गेल्याने आता एप्रिलच्या मध्यानंतर आणि मे महिन्यात काय होणार, हा विचार करून लोकांची चिंता वाढली आहे. मात्र, डॉक्टरांनी याबाबत नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. दुपारी १ ते ४ वाजेदरम्यान घराबाहेर जाण्याचे टाळावे, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नये, भरपूर पाणी, ज्यूस, नारळपाणी, ताक घेण्याचा सल्लाही दिला आहे.

First Published on: April 6, 2022 9:55 AM
Exit mobile version