ठरलं ! कचर्‍यापासून खत निर्मिती प्रकल्पाच्या आर्थिक खर्चास मान्यता

ठरलं ! कचर्‍यापासून खत निर्मिती प्रकल्पाच्या आर्थिक खर्चास मान्यता

भाईंदर :  मिरा-भाईंदर शहरात दैनंदिन निघणार्‍या कचर्‍यापासून खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. परंतु हा प्रकल्प चालू केला तर स्थानिक नागरिकांना त्यापासून निर्माण होणार्‍या दुर्गंधीमुळे त्रास होणार असल्याचे सांगत शिवसेनेने या प्रकल्प उभारणीस विरोध केला आहे. परंतु मनपा आयुक्त यांनी प्रकल्प उभारण्यासाठी लागणार्‍या अंदाजपत्रकीय आर्थिक खर्चास मान्यता दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात असलेली शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिरा-भाईंदर मध्ये दिवसेंदिवस दैनंदिन कचरा वाढत आहे. अगोदरच डम्पिंग ग्राउंडची समस्या असताना या कचर्‍यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. या कचर्‍याची वाहतूक करणे अडचणीचे ठरत आहे. यावर पर्याय म्हणून प्रत्येक प्रभागामध्ये दररोज निघणार्‍या कचर्‍यावर त्याच प्रभागात शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून खत निर्मिती करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने निधी मंजूर करावा अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्यानुसार शहराच्या विविध परिसरात कचर्‍यापासून खत निर्मिती करणारे १० प्रकल्प उभारण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. राज्य शासनाने या कामासाठी पहिल्या टप्प्यात पाच कोटींचा निधी देखील मंजूर केला आहे. खत निर्मिती प्रकल्पासाठी सुमारे १५० कोटी खर्च येणार आहे. यातील ७५ टक्के निधी राज्य शासन तर २५ टक्के निधी हा पालिकेला उपलब्ध करावा लागणार आहे.

First Published on: September 27, 2022 7:55 PM
Exit mobile version