पाऊले चालती शहरांची वाट ! गाव, बाजारात शुकशुकाट

पाऊले चालती शहरांची वाट ! गाव, बाजारात शुकशुकाट

जव्हार : जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी तथा अल्पभूधारक शेतमजूर शहरात अधिक मजुरी मिळत असल्याने कुटुंबासहित स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात शुकशुकाट पडून गावे ओस पडली आहेत. भिवंडी, ठाणे, बोईसर, पालघर, वसई या शहरांत मिळणारी मजुरी ही स्थानिक पातळीवर मिळणार्‍या मजुरीपेक्षा अधिक असल्याने येथून गेलेल्या मजुरांना पोटाची खळगी भरून दोन पैसे बाळगणे अधिक सोपे होत असल्याने संपूर्ण कुटुंबासहीत येथील आदिवासी शेतकरी तथा शेतमजूर हा शहराकडे भात कापणी किंवा इतर अन्य शेतीच्या कामासाठी किंवा मजुरीसाठी शहराकडे धाव घेत आहे. शासकीय योजनेतून नरेगाची कामेही चालू नसल्यामुळे तालुक्यातील डोंगराळ भागात रोजगार मिळत नसल्याची ओरड कायम आहे. पण त्यांना मिळणारा शेतीतील रोजगार हा पुरेसा नसल्यामुळे हंगामापुरते काम मिळते व इतर वेळा रोजगारासाठी इतर ठिकाणी हे जावे लागते. फक्त शेतमजुरांची भिस्त ही शेतकर्‍यांवर आहे. त्यामुळे तालुक्यातील डोंगराळ भागातील अनेक गावखेड्यांमधील मजूर स्थलांतरित होत असल्याने तालुक्यातील अनेक खेडी ओस पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बाहेर पडल्यास हाताला काम मिळेल; परंतु इतर ठिकाणी आजारी पडल्यास प्राथमिक उपचार मिळत नाहीत. यामुळे प्रचंड गैरसोय होते.

मजूर बाहेर गेल्यावर सुरू होतात कामे

केंद्र शासनाच्या सर्व योजना पंचायत समितीमार्फत राबविल्या जातात. मात्र योजना राबविताना त्यांचा मजुरांना पत्ताही लागत नाही. कामासाठी मजुरांचे स्थलांतर झाले की गावाकडची कामे मंजूर होतात आणि कामासाठी मजूर मिळत नसल्याची ओरड होते. मजुरांचे हे दुष्टचक्र थांबता थांबत नाही, असा आरोप तालुक्यातील आदिवासी मजूर वर्गातून होत आहे.

First Published on: November 4, 2022 9:02 PM
Exit mobile version