दोघांच्या वादात एकाने जीव गमावला

दोघांच्या वादात एकाने जीव गमावला

वसई: पत्नीला फोन करणाऱ्या युवकाशी झालेल्या भांडणात पतीच्या भावाचा खून करण्यात आल्याची घटना विरार पूर्वेकडील साईनाथ नगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आले असून एक आरोपी फरार झाला आहे. साईनाथ नगरमधील वज्रेश्वरी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या दत्तात्रय शिंदे यांची पत्नी मोबाईलवर कुणाशी तरी बोलत होती. दत्तात्रय शिंदे यांनी कुणाशी बोलते आहेस असे पत्नीला विचारले. पण, तिने उत्तर देण्याचे टाळले. त्यामुळे दत्तात्रय शिंदेंना त्यानंबरवर पुन्हा फोन करून जाब विचारला असता वाद झाला. त्यामुळे संतापलेला दत्तात्रय शिंदे आपला भाऊ सचिन शिंदेला घेऊन राहुल शिंदे नावाच्या तरुणाला याप्रकरणी जाब विचारण्यासाठी साईनाथ नाका येथे गेले.त्याठिकाणी राहुल शिंदेसोबत त्याचा भाऊ किरण शिंदे आणि एक अनोळखी तरुण उभा होता.

यावेळी जाब विचारायला आलेल्या दत्तात्रय शिंदेला तिघांनी मारहाण करायला सुरुवात केली. तेव्हा दत्तात्रयचा भाऊ सचिन शिंदे मध्यस्थी करू लागला असता राहुलने चाकू काढून सचिनच्या पोटात खुपसला तसेच डोक्यावरही चाकूने वार केला. त्यानंतर तिघेही आरोपी पसार झाले.स्थानिकांच्या मदतीने सचिनला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचार सुरु झाल्यानंतर काही तासातच त्याचा जीव गेला. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून किरण शिंदे आणि राहुल शिंदे यादोघांना अटक केली आहे. तर तिसरा साथिदार फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. 

First Published on: May 16, 2023 8:38 PM
Exit mobile version