सामुदायिक विवाहासाठीचे अनुदान २५ हजार होणार

सामुदायिक विवाहासाठीचे अनुदान २५ हजार होणार

आदिवासी तसेच आर्थिक दुर्बल घटकातील वधू-वर सामुदायिक विवाह सोहळ्यास शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सामुदायिक विवाह सोहळ्यातील विवाहासाठीचे अनुदान २५ हजारांपर्यंत नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावेळी सकारात्मकता दर्शवली.

शिवसेना पालघर जिल्हा आणि आधार प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासी आणि आर्थिकदृष्ठ्या दुर्बल घटकांतील वधू-वरांचा सामुदायिक विवाह सोहळा शनिवारी बोईसर येथे आयोजित करण्यात आला होता. या सामुदायिक विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार रवींद्र फाटक, राजेश पाटील, श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मुख्यमंत्री शिंदे यांनी संबोधित केले. ते म्हणाले की, शेतकरी सन्मान योजनेतून केंद्राचे ६ हजार रुपये व राज्य सरकारचे ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये शेतकरी बांधवांना देण्यात येतात, परंतु यामध्ये वाढ करण्यास राज्य सरकार सकारात्मक आहे. या भागाच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे. वांद्रे-वर्सोवा ब्रिज विरारपर्यंत आणला जाईल. कामगारांसाठी १५० बेडचे ईएसआय हॉस्पिटल अंतिम टप्प्यात आहे. विरारपासून कोस्टल हायवे अ‍ॅक्सेस कंट्रोल थेट पालघरपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. एमएमआरडीएद्वारे आवश्यक प्रकल्प दिले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आदिवासी आणि आर्थिकदृष्ठ्या दुर्बल घटकातील २०१ जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून आधार प्रतिष्ठानने एक उत्तम आदर्श निर्माण केला आहे. सामुदायिक विवाह सोहळ्याच्या आयोजनात पुढाकार आणि लोकप्रतिनिधी तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी अशा विवाह सोहळ्यांना उपस्थिती लावल्यास सर्वसामान्य कुटुंबातील विवाह सोहळे दिमाखात होण्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिमाखदार सामुदायिक विवाह सोहळ्याच्या आयोजनाबाबत आयोजक जगदिश धोडी आणि आधार प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.

सामुदायिक विवाह सोहळे गरजेचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून अशा कार्यक्रमाला प्रत्येकाने आवर्जून वेळ काढून जायला हवे. आर्थिकदृष्ठ्या दुर्बल घटकातील वधू-वरांचा विवाह होतो ही अभिमानाची बाब आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रत्येकाने सामुदायिक विवाह सोहळ्याला सहकार्य केले पाहिजे. कर्ज काढून लग्नसोहळे केल्याने पालकांच्या मागे चिंता लागतात. असा खर्च टाळता यावा यासाठी असे सामुदायिक विवाह सोहळे गरजेचे असून ही समाज व काळाची गरज आहे.

First Published on: May 21, 2023 4:16 AM
Exit mobile version