भारतीय क्रीकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने नोव्हेंबर २०२१ मधील टी२० वर्ल्ड कपनंतर कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. विराट कोहलीच्या घोषणेनंतर क्रिकेट खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांमध्ये चर्चा सुरु झआली आहे. गुरुवारी विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून विराटबाबत चर्चा करण्यात येत आहे. क्रिकेट पंडितांकडून देखील विराट कोहलीच्या अल्पावधित खेळाच्या लहान स्वरुपात केलेल्या रेकॉर्डबाबत मत व्यक्त करत आहेत.
विराट कोहलीच्या नंतर भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा टी२० मध्ये कर्णधार होण्यासाठी योग्य असल्याचे माजी क्रिकेट पटू दिलीप वेंगसरकर यांनी म्हटलं आहे. रोहित शर्माने आपल्या आयपीएल संघाचे नेतृत्व केलं आहे. भविष्यात भारतीय संघाची कर्णधारपदाची जबाबदारी पार पडण्याच्या संधीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. रोहित भारताचा पुढील टी २० कर्णधार होण्यासाठी पात्र आहे. रोहित शर्माला जेव्हा जेव्हा संधी देण्यात आली आहे. तेव्हा त्याने चांगली कामगिरी केली आहे. २०१८ मध्ये भारताने त्याच्या नेतृत्वाखाली आशिया कप जिंकला. रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी एक चांगला कर्णधार होता असे दिलीप वेंगसरकर यांनी सांगितले.
वर्ल्ड कप नंतर कर्णधारपद सोडण्याची शक्यता होती
विराट कोहलीने टी २० कर्णधारपद सोडण्याची घोषणा केल्यानंतर माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी म्हटलं आहे की, विराट कोहली हा जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, इंग्लंडच्या सामन्यानंतर विराट कोहली टी २० फॉर्मेटमधील कर्णधारपद सोडण्याची अपेक्षा होती. विराट मागील काही काळापासून टी २० फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी करत नव्हता असेही वेंगसरकर यांनी म्हटलं आहे.
रोहित शर्माकडे कर्णधारपद?
भारतीय संघाचा सलामीवीर खेळाडू रोहित शर्माकडे टी २० चे कर्णधारपद जाण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये जबरदस्त कर्णधारपदाची धुरा सांभाळत सर्वाधिक ५ वेळा विजय मिळवून दिला आहे. रोहित शर्मा आतापर्यंत भारतीय संघासाठी ४३ सामने खेळला आहे. रोहित शर्माने आतापर्यंत २ द्विशतकं, १४ अर्धशतकं केली आहेत. २२७ वन डे रोहित शर्मा खेळला असून यामध्ये शर्माने २९ शतकं आणि ४३ अर्धशतकं झळकावली आहेत. आतापर्यंत ३ द्विशतकं ठोकणारा रोहित शर्मा हा एकमेव आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे.