योजनेप्रमाणे गोलंदाजी केली नाही !

योजनेप्रमाणे गोलंदाजी केली नाही !

कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर रहाणेची प्रतिक्रिया

आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने राजस्थान रॉयल्सचा ८ विकेट आणि ३७ चेंडू राखून अगदी सहज पराभव केला. हा राजस्थानचा पाच सामन्यांतील चौथा पराभव होता. या सामन्यात राजस्थानने दिलेले १४० धावांचे आव्हान कोलकाताने १३.५ षटकांतच पूर्ण केले. या पराभवानंतर राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे फारसा खुश नव्हता. आम्ही या सामन्यात योजनेप्रमाणे गोलंदाजी केली नाही, असे सामन्यानंतर रहाणे म्हणाला.

आम्ही या सामन्यात २०-३० धावा कमी केल्या. या खेळपट्टीवर १५०-१६० धावा केल्या असत्या तर आम्ही चांगली झुंज देऊ शकलो असतो, पण आम्ही धावा फलकावर लावल्या होत्या आणि ही खेळपट्टी संथ होती. आम्ही योजनेप्रमाणे गोलंदाजी केली नाही. आम्हाला या सामन्यात खूप काही शिकायला मिळाले आहे. अशा गोष्टी क्रिकेटमध्ये होऊ शकतात.

मात्र, आम्हाला चुकांमधून शिकण्याची गरज आहे. आम्ही या स्पर्धेत बरेच सामने गमावले असले तरी आम्हाला चांगले क्रिकेट खेळण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असे रहाणेने सांगितले.

First Published on: April 9, 2019 4:58 AM
Exit mobile version