IND vs ENG : भारत फ्रंटफूटवर; दुसऱ्या कसोटीत विजयापासून ७ विकेट दूर 

IND vs ENG : भारत फ्रंटफूटवर; दुसऱ्या कसोटीत विजयापासून ७ विकेट दूर 

अश्विन आणि रोहित शर्मा

रविचंद्रन अश्विनच्या शतकानंतर अक्षर पटेलने केलेल्या अप्रतिम गोलंदाजीमुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाला विजयाची संधी आहे. भारताने या सामन्यात इंग्लंडपुढे विजयासाठी ४८२ धावांचे आव्हान ठेवले आणि याचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडची ३ बाद ५३ अशी अवस्था होती. त्यामुळे भारताला जिंकण्यासाठी आणखी ७ विकेटची, तर इंग्लंडला ४२९ धावांची आवश्यकता होती. ४८२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने सलामीवीर डॉम सिबली (३) आणि जॅक लिच (०) यांना झटपट बाद केले. रोरी बर्न्सने काही चांगले फटके मारले. मात्र, २५ धावांवर त्याला अश्विनने कर्णधार विराट कोहलीकरवी झेलबाद केले. त्यामुळे दिवसअखेर इंग्लंडची १९ षटकांत ३ बाद ५३ अशी अवस्था होती.

भारताच्या दुसऱ्या डावात २८६ धावा

त्याआधी भारताने आपल्या दुसऱ्या डावात २८६ धावांची मजल मारली. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने लवकर पाच विकेट गमावल्या. १०६ धावांवर भारताने ६ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर मात्र अश्विन (१०६) आणि कोहली (६२) यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. या दोघांनी ९६ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारताने अडीचशे धावांचा टप्पा पार केला. इंग्लंडकडून मोईन अली आणि जॅक लिच यांनी ४-४ विकेट घेतल्या.

 

First Published on: February 15, 2021 5:58 PM
Exit mobile version