आगामी कसोटी मालिकेत मायदेशात खेळणारा ऑस्ट्रेलियाचा संघ भारताला अगदी सहजपणे पराभूत करेल, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने व्यक्त केले. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम संघ मानले जातात. तसेच मागील वर्षी भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यामुळे यंदाच्या कसोटी मालिकेची चाहते, तसेच दोन्ही संघांचे खेळाडू आतुरतेने वाट पाहत आहेत.
‘विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. त्याचे हे पहिलेच अपत्य असणार आहे. त्यामुळे त्याने घेतलेला निर्णय योग्यच आहे. मात्र, कोहली नसल्याने भारताचे नुकसान होईल आणि ऑस्ट्रेलिया अगदी सहजपणे ही मालिका जिंकेल,’ असे मायकल वॉनने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले.