IPL 2021 : मुंबईचे फलंदाज पुन्हा फेल; पंजाब किंग्स विजयी 

IPL 2021 : मुंबईचे फलंदाज पुन्हा फेल; पंजाब किंग्स विजयी 

रोहितचे अर्धशतक वाया; पंजाब विजयी 

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव वगळता इतर फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका मुंबईला बसला. आज झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) सामन्यात मुंबईला पंजाब किंग्सने ९ विकेट राखून पराभूत केले. हा मुंबईचा पाच सामन्यांत तिसरा पराभव ठरला, तर पंजाबचा पाच सामन्यांत दुसरा विजय ठरला. तसेच मुंबईविरुद्ध हा पंजाबचा विकेटच्या बाबतीत सर्वात मोठा विजय होता. हा सामना जिंकण्यासाठी मुंबईने पंजाबला १३२ धावांचे आव्हान दिले होते, जे त्यांनी १४ चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण केले. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने ५२ चेंडूत नाबाद ६० धावांची खेळी केली. त्याला मयांक अगरवाल (२५) आणि क्रिस गेल (नाबाद ४३) यांची चांगली साथ लाभली.

मुंबईच्या ७ षटकांत केवळ २६ धावा

त्याआधी या सामन्यात राहुलने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. मुंबईचा सलामीवीर क्विंटन डी कॉक (३), तसेच ईशान किशन (६) लवकर बाद झाले. त्यामुळे मुंबईची ७ षटकांत २ बाद २६ अशी अवस्था होती. यानंतर रोहित (६३) आणि सूर्यकुमार (३३) यांनी अप्रतिम फलंदाजी करत मुंबईला सावरले. रोहितचे हे यंदा पहिले अर्धशतक ठरले. मात्र, यानंतर पोलार्ड (नाबाद १६) वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. त्यामुळे मुंबईला २० षटकांत ६ बाद १३१ धावाच करता आल्या.

First Published on: April 23, 2021 11:34 PM
Exit mobile version