भारत, इंग्लंड विश्वचषकाचे प्रमुख दावेदार

भारत, इंग्लंड विश्वचषकाचे प्रमुख दावेदार

व्ही.व्ही.एस लक्ष्मणचे विधान

इंग्लंडमध्ये मे महिन्यात सुरु होणारा विश्वचषक जिंकण्याचे यजमान इंग्लंड आणि भारत हे दोन संघ प्रमुख दावेदार आहेत, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने व्यक्त केले आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये तर न्यूझीलंडला न्यूझीलंडमध्ये पराभूत करत एकदिवसीय मालिका जिंकली होती. तसेच भारतीय संघात चांगला समतोल आहे. भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांच्या प्रदर्शनाविषयी प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र त्यांनी या दोन मालिकांमध्ये चांगली कामगिरी करत आपण विश्वचषकासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे भारत हा विश्वचषक जिंकू शकेल असा लक्ष्मणचा अंदाज आहे.

मोठ्या स्पर्धांमध्ये योग्यवेळी कामगिरीचा स्तर उंचावणे महत्त्वाचे असते. विश्वचषकाचा कार्यक्रम हा खूप व्यस्त आणि मोठा असतो. त्यामुळे भारताला जर हा विश्वचषक जिंकायचा असेल तर सर्व खेळाडूंनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या फिट असण्याची गरज आहे. या स्पर्धेत जेतेपदाचे ते प्रबळ दावेदार आहेत. माझ्यासाठी विश्वचषक जेतेपदाच्या शर्यतीत भारत आणि इंग्लंड हे दोन संघ आघाडीवर आहेत, असे लक्ष्मण म्हणाला.

तसेच लक्ष्मणने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील मालिका जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे कौतुक केले. संपूर्ण संघाने या मालिकांमध्ये अप्रतिम कामगिरी केली. सर्व खेळाडूंनी संघाच्या विजयात योगदान दिले. त्यामुळे मला भारतीय संघाचे अभिनंदन करायला आवडेल, असे लक्ष्मणने सांगितले.

First Published on: February 15, 2019 4:40 AM
Exit mobile version