IND vs ENG : तर कोहलीला भारताचे कर्णधारपद सोडावे लागेल – मॉन्टी पनेसार

IND vs ENG : तर कोहलीला भारताचे कर्णधारपद सोडावे लागेल – मॉन्टी पनेसार

विराट कोहली

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारताने हा सामना २२७ धावांनी गमावला. त्यामुळे भारतीय संघ चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेत ०-१ असा पिछाडीवर पडला आहे. भारताने नुकतीच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. मात्र, विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताला पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणेने कर्णधारपद स्वीकारले आणि भारताने तीन पैकी दोन सामने जिंकत कसोटी मालिका जिंकली. इंग्लंडविरुद्ध कोहलीचे पुनरागमन झाले. परंतु, त्याला कर्णधार म्हणून प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे आता कोहलीवर इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकण्याचा दबाव आहे, असे इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पनेसारला वाटते.

फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ

कोहलीच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यास त्याला कर्णधारपद सोडावे लागू शकेल. कर्णधार म्हणून कोहलीसाठी ही मालिका अत्यंत महत्वाची आहे. तो जर या मालिकेत अपयशी ठरला, तर भारताला कर्णधार बदलणे भाग पडेल. त्याने आता बहुधा केवळ फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायची वेळ आली आहे. त्यामुळे कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला ही मालिका जिंकण्यात अपयश आल्यास कसोटी क्रिकेटमध्ये रहाणेची कर्णधारपदी निवड झाली पाहिजे, असे पनेसार म्हणाला.

कोहलीवर कर्णधार म्हणून दबाव

कोहलीवर आता कर्णधार म्हणून नक्कीच दबाव आहे. त्याने दुसऱ्या कसोटीत कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. माझ्या मते, भारताने कर्णधार बदलण्यासाठी फार वेळ लावता कामा नये. भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत पराभूत झाला, तर त्यांनी त्वरित कोहलीला कर्णधारपदावरून हटवले पाहिजे, असेही पनेसारने एका मुलाखतीत सांगितले. कोहलीने आतापर्यंत ५७ कसोटीत भारताचे नेतृत्व केले असून त्यापैकी ३३ सामने भारताने जिंकले आहेत.


हेही वाचा – श्रेयस अय्यर ‘या’ संघाच्या कर्णधारपदी


 

First Published on: February 11, 2021 9:52 PM
Exit mobile version