आठ वर्षांनी सापडला खूनी, नेपाळ भारत सीमेवरून केले अटक

आठ वर्षांनी सापडला खूनी, नेपाळ भारत सीमेवरून केले अटक

खून करून नेपाळ येथे पळून गेलेल्या आरोपीला आठ वर्षांनी नेपाळ भारत सीमेवरून अटक करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश आले आहे. इनामुल इयादअली हक, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

इनामुल हा ठाणे पूर्व कोपरी येथे मित्र कदम्बुल उर्फ ताजामुल उर्फ ताज्याजुल हक दुख्खु शेख याच्यासोबत राहण्यास होता. क्षुल्लक कारणावरून या दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि इनामुल याने १२ वर्षांपूर्वी मित्र कदम्बुल उर्फ ताजामुल याचा खून करून पळ काढला होता. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात इनामुल याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचा शोध घेऊनही तो मिळून येत नव्हता. अखेर इनामुल याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा घटक १ कडे प्रकरण सोपवण्यात आले. गुन्हे शाखेने तपास सुरु करून इनामुल याची माहिती काढण्यास सुरुवात केली असता इनामुल हा मूळचा पश्चिम बंगाल येथे राहत असल्याची माहिती मिळाली. मात्र, सध्या तो पश्चिम बंगाल येथे राहत नसून नेपाळ येथे राहण्यास असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. तसेच अधून मधून इनामुल हा पश्चिम बंगाल येथे कुटुंबाला भेटण्यास येत असल्याची माहीत गुन्हे शाखेला मिळाली.

या अनुषंगाने पोलिसांनी आपले खबरीचे जाळे पसरवून इनामुल हा पश्चिम बंगाल येथे कधी येतो कसा येतो याची माहिती मिळवली. दरम्यान, ठाणे गुन्हे शाखेने तेथील विशेष पोलीस पथकांची मदत घेऊन इनामुल कुटुंबाला भेटण्यासाठी आला असता त्याला नेपाळ भारत सीमेवरच अटक करण्यात आली. इनामुल याला अटक करून ठाण्यात आणले असून पुढील तपासासाठी त्याला कोपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती वपोनि नितीन ठाकरे यांनी दिली.


हेही वाचा – बिहारमधील सराईत गुन्हेगाराला नाशिकमधून अटक


 

First Published on: January 1, 2021 10:03 PM
Exit mobile version