कळव्यात रेल्वे प्रवाश्यांचा उद्रेक; एसी लोकल रोखली, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

कळव्यात रेल्वे प्रवाश्यांचा उद्रेक; एसी लोकल रोखली, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

ठाणे – कळवा रेल्वे स्थानकात प्रवाशांनी आंदोलन केले आहे. नवीन ट्रॅक होऊनही लोकल ट्रेनच्या ट्रॅकवरून मेल गाड्या  चालवल्यामुळे ट्रेनमध्ये चढता येत नसल्याने प्रवाशांनी हे आंदोलन केले आहे. यावेळी कळवा कारशेडमधून सकाळी लोकल पकडणाऱ्या रेल्वे प्रवाशांनी काहीवेळ एसी लोकल रोखत आपला विरोध दर्शवला. रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना शांत राहण्याचे आवाहन केले. प्रवाशांना हटवत पोलिसांनी लोकल वाहतूक पूर्ववत केली आहे. एसी लोकल फेऱ्या वाढवल्याने प्रवाशांचा उद्रेक झाला आणि त्यांनी अचानक आंदोलन केले.

हे आंदोलन कारशेडमधून येणाऱ्या ट्रॅकवर करण्यात आले, त्यामुळे एसी लोकल अडविण्यात आले,पण या आंदोलनाचा रेल्वे वाहतुकीवर कोणत्याही प्रकारे परिणाम झाला नाही, मात्र आंदोलन करणाऱ्या काही महिला प्रवाशांना कळवा स्थानकात थांबवण्यात आले आहे, तर अन्य दोन प्रवाशांना कळवा पोलीस ठाण्यात नेल्याचे बोलले जात आहे. सकाळी कामाला जाताना लोकलमध्ये चढता येत नसल्याने प्रवासी कारशेडमधून सुटणाऱ्या लोकलमध्ये चढून प्रवास करतात, असे प्रवासी संघटना आणि प्रवासी यांचे म्हणणे आहे. अचानक झालेल्या या उद्रेकामध्ये पोलिसांकडून लाढीचार्ज करण्यात आला असेही प्रवासी संघटनेचे सिध्देश देसाई यांनी म्हटले आहे.

नवीन ट्रॅक होऊनही मेल चालवल्यामुळे ट्रेनमध्ये प्रवाशांना प्रवास करायला मिळत नही. यामुळे जीव धोक्यात टाकून कारशेड लोकलमधून प्रवासी प्रवासाचा प्रयत्न केला जातो. मात्र आज याविरोधात आंदोलन करताना प्रवाशांवर अन्यायकारक लाठी चार्ज करण्यात आल्याने संबंधित अधिकाऱ्यांचा प्रवाशांनी जाहीर निषेध केला.

अनेक वेळेला लोकशाही मार्गाने आंदोलने केली, अनेक वेळेला अधिकाऱ्यांना भेटून बैठका झाल्या. 50 च्या वर पत्र विविध अधिकारी आणि रेल्वे मंत्रालयाला देऊन सुद्धा अनेक वर्ष जर कळव्याच्या प्रवाशांवर अन्यायच होणार असेल तर प्रवाश्यांना आंदोलन केल्याशिवाय पर्यायच शिल्लक राहत नाही. असे मत प्रवासी आणि प्रवासी संघटनांकडून व्यक्त होत आहे. 6 ऑगस्टचे आंदोलन प्रवाशांनी 26 जुलै रोजी ADRM आणि अधिकाऱ्यांशी झालेल्या आंदोलनानंतर पुढे ढकलले होते. मात्र प्रवाशांनी दिलेल्या आश्वासनांपैकी एकही गोष्ट अधिकाऱ्यांनी केली नाही आणि ह्या नाकर्तेपणा मुळेच आज प्रवाशांचा रागाचा कडेलोट झाला आहे.

नवीन ट्रॅक मेल साठी? गाड्या कळव्याला पण प्रवाश्यांनी आणि गाडी दोघांनी जावे ठाण्याला अशी विचित्र अट आणि परिष्टीतीमुळेच नवीन ट्रॅक होऊनही 147 मृत्यू ह्याच ठिकाणी झालेले आहेत. आणि तरीसुद्धा कारशेड लोकलकडे होम प्लॅटफॉर्म बंधने किंवा नवीन ट्रॅक लोकलसाठी आरक्षित करून लोकल वाढविणे हे करण्याऐवजी अधिकारी मेल चालवण्यात मग्न आहेत. पारसिक बोगदा मेलसाठी उपलब्ध असूनही मेल एक्स्प्रेस कळवा ते दिवा नवीन ट्रॅक वरून चालवण्याचा नातदृष्ट पणामुळे रोजच लोकल 10- 20 मिनिटे उशिराने चालत आहेत. अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाश्यांकडून येत आहे.

लोकशाही ची 75 वर्षे साजरी करताना मुंबईकर रेल्वे प्रवाश्यांना फक्त मृत्यू देणाऱ्या अश्या अधिकाऱ्यांचा निषेध आणि आता हे प्रवासी आंदोलन रेल्वेच्या उज्वल इतिहासावर कलंक आहे. अशी प्रतिक्रिया देखील प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.


हेही वाचा – शिवसंग्राम पक्षाचे नेतृत्त्व आता डॉ.ज्योती मेटेंकडे? कार्यकर्त्यांनी केली मागणी

First Published on: August 19, 2022 10:29 AM
Exit mobile version