भाजपनं शिवसेनेची फसवणूक केली – अशोक चव्हाण

भाजपनं शिवसेनेची फसवणूक केली – अशोक चव्हाण

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपनं शिवसेनेची फसवणूक केली असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय अस्थिरतेची जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती केवळ भाजपच्या नेतृत्वामुळे झाली आहे. भाजपने कबुल केलेली आश्वासनांसोबत फारकत घेतली असून शिवसेनेची फसवणूक केली आहे. निवडणूक होऊनही आठवडा गेला तरी अद्याप कोणता निर्णय होत नाही. यासाठी भाजप पूर्णपणे जबाबदार आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये जी अंतर्गत चर्चा झाली होती, भाजपने जी वचनं दिली होती ती पाळली नाहीत. यामुळेच वाद निर्माण झाले असल्याचं ही अशोक चव्हाण म्हणालेत.

तसंच, शिवसेनेबाबत काँग्रेसची अजूनही वेट अँड वॉच ची भूमिका आहे. शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत अजूनही काही ठरलं नसल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. या सर्व परिस्थितीवर काँग्रेसचे नेतृत्वंही लक्ष ठेऊन आहेत, त्यानुसार निर्णय घेतला जाईल असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

काँग्रेसची वेट अँड वॉचची भूमिका –

राज्यातील निवडणुका होऊन आठवडा उलटून गेला आहे तरीही सत्तास्थापनेवरुन भाजप आणि शिवसेना कोणत्याही प्रकारचा निर्णय घेत नाही. त्यातच, काँग्रेसनेही वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. त्यामुळे, येत्या काही काळात शिवसेना आणि भाजप काय भूमिका घेते हे समोर येईलच. भाजपा आणि शिवसेनेचं सत्तास्थापनेचं काही ठरत नसल्याने काँग्रेसचे नेते सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले आहेत. पण, सोनिया गांधी यांची आणि या शिष्टमंडळाची भेट अद्याप झालेली नाही. पण, या सर्वावरुन काँग्रेसने वाट पाहण्याची भूमिका घेतली आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या पाठिंब्यावरुन काँग्रेसमध्येही दोन गट पडलेले दिसतात. एकीकडे शिवसेनेला पाठींबा देऊ नये असं मत सुशीलकुमार शिंदे आणि संजय निरुपम या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केले आहे. तर, भाजपा आणि शिवसेनेच्या भांडणात काँग्रेसने पडायची गरज नाही असं निरुपम यांनी म्हटलं आहे. या सगळ्यामुळे काँग्रेसमध्येच पाठिंबा द्यायचा की नाही यावर एकमत नसल्याचं चित्र आहे.

First Published on: November 1, 2019 4:07 PM
Exit mobile version