“यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुळीच दम राहिलेला नाही. कारण आमच्या विरोधात लढणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमकुवत झालेला आहेत. शाळेची लहान मुलेसुद्धा सांगतील की यंदा भाजप-शिवसेना सरकार सत्तेवर येणार,” अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाची खिल्ली उडवली. भाजपचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथील गोल मैदान या ठिकाणी आले होते. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली.
डिजिटलायझेशनमुळे मुले सरकारी शाळांकडे वळली
ते पुढे म्हणाले की, “गेल्या १५ वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने जी कामे केली आहेत, त्यांच्यापेक्षा दुप्पट कामे आम्ही या ५ वर्षात केली आहेत. सरकारने शिक्षण, उद्योग, रोजगार या क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून रस्ते, पाणी, गरिबांना घरे या क्षेत्रात इतर राज्यांपेक्षा २५ पट जास्त प्रगती केली आहे. सरकारी शाळांचे डिजिटलायझेशन केल्यामुळे आता इंग्रजी माध्यमांची मुले सरकारी शाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत, असा दावा मुख्यमंत्रांनी यावेळी केला.
हेही वाचा – भायखळा, धारावीत ६३ लाखांची संशयास्पद रक्कम जप्त
उल्हासनगरवासीयांना मेट्रोचे गाजर?
कल्याण, नवी मुंबई आणि भिवंडी पर्यंत मेट्रो रेल्वे पोहचणार आहे. मात्र आम्ही ती आता उल्हासनगरपर्यंत आणणार आणि येथील मेट्रोच्या स्टेशनला सिंधूनगर हे नाव देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
अविनाश महातेकरांनी रिपाईच्या बंडखोरांचा समाचार घेतला
उल्हासनगर व अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप उमेदवार उभे असताना युतीच्या रिपाई (आठवले गट) रिपाई कडून बंडखोर उमेदवार निवडणुकीत उभे आहेत. या बंडखोर उमेदवारांना मते न देता युतीच्या अधिकृत उमेवारांना मते द्या, असे आवाहन अविनाश महातेकर यांनी केले. या प्रचारसभेला रामदास आठवले आले नाहीत. म्हणून त्यांचा रिपाईच्या बंडखोर उमेदवारांना गुप्तरीत्या पाठिंबा आहे, अशी चर्चा होती. मात्र महातेकर यांनी या शक्यतेचे खंडन केले.