चाणक्य नीतीचे रचनाकार आचार्य चाणक्य यांना बुद्धिमत्ता आणि वेगवेगळ्या विषयातील पारंगतेतमुळे आजही श्रेष्ठ विद्वान म्हणून ओळखले जाते. ते एक कुशल, रणनीतीकार तसेच एक महान अर्थशास्त्रीसुद्धा होते. चाणक्यांनी अनेक शास्त्रांची रचना केली, ज्यांचा वापर आजही अनेकजण करतात. त्यांनी लिहिलेल्या नीतीशास्त्राच्या गोष्टी आजही खूप प्रसिद्ध आहेत.
आचार्यांच्या या नीतीशास्त्राला ‘चाणक्य नीती’ म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये मानवी जीवनाच्या अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत. जर प्रत्येक व्यक्तीने जीवनात या गोष्टींचा अवलंब केला तर आयुष्यातील अनेक संकटांवर मात करता येईल, शिवाय आयुष्यही सुखकर होईल.
चाणक्यांच्या मते समोरच्या व्यक्तीला कसे पारखावे?
श्लोक
यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते निघर्षणच्छेदनतापताडनैः ।
तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते त्यागेन शीलेन गुणेन कर्मणा ।।
हा चाणक्य लिखित श्लोक असून त्यात ते म्हणत आहेत की, सोन्याची पारख त्याला घासून, कापून, गरम करून किंवा आपटून केली जाते. त्याचप्रमाणे एका व्यक्तिचे परिक्षण सुद्धा त्याच्या त्यागावरून, आचरणावरून, गुणांवरून आणि कर्मावरून केली जाते.
- त्याग
चाणक्यांच्या मते कोणत्याही व्यक्तीला पारखण्यासाठी त्या व्यक्तीची त्याग करण्याची क्षमता पाहा. जो व्यक्ती दुसऱ्याच्या सुखात सुखी आणि दुसऱ्याच्या दुःखात स्वतःच्या सुखाचा त्याग करतो अशी व्यक्ती कधीही श्रेष्ठ मानली जाते. मात्र एखादी व्यक्ती स्वतःला खूप चांगले मानतो परंतु दुसऱ्याच्या संकट काळात त्याला मदत करत नाही. अशी व्यक्ती काहीच कामाची नसते. - आचरण
कोणत्याही व्यक्तीला ओळखायचे असेल तर, त्या व्यक्तीचे आचरण पहा. कारण जी व्यक्ती चांगली असते. ती प्रत्येक वाईट गोष्टीपासून लांब असते. मात्र जी व्यक्ती वाईट मार्गावर असते, त्या व्यक्तीचे आचरण कधीही चांगले नसते. - गुण
व्यक्तीला पारखण्यासाठी त्याचे गुण बघणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले आणि वाईट गुण असतात. परंतु एखाद्यामध्ये खोटं बोलणे, अहंकारी असणे, इतरांचा अपमान करणे यांसारखे गुण असल्यास अशा व्यक्तीपासून लांब रहा. - कर्म
चाणक्यांच्या मते कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कर्माद्वारे सहज ओळखले जाऊ शकते. जर एखादी व्यक्ती चुकीच्या मार्गाने पैसा कमवत असेल, प्रत्येक काम वाईट मार्गाने करत असेल. तर अशा व्यक्तीपासून चार हात लांब रहा.