फार पूर्वीपासून लग्न पद्धतीत या अगदी थाटामाटात केल्या जातात. लग्न ही परंपरा आयुष्यातील एक बंधन आहे. पतीच्या दिर्घआयुसाठी पत्नी मंगळसूत्र घालण्यास नेहमी तत्पर असते. अशातच हिंदू धर्मातील विवाहित महिलांसाठी मंगळसूत्र हा सर्वात महत्त्वाचा अलंकार मानला जातो. मंगळसूत्र हे लग्नाचे आणि सौभाग्याचे प्रतीक म्हणून परिधान केले जाते. मंगळसूत्र घालण्याची परंपरा हिंदू सनातन धर्माची आहे. जी आजही आवडीने पाळली जाते. कारण प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी मंगळसूत्र खूप महत्वाचे आणि प्रिय आहे.
मंगळसूत्र म्हणजे काळ्या मण्यांची माळ व त्याला एक किंवा दोन वाट्या असतात. ह्या वाट्यांना मंगळसूत्रात व स्त्रीच्या आयुष्यात फार महत्व आहे. योग्य मंगळसूत्राची लांबी अशी पाहिजे की जेणेकरून ते घातल्यावर वाट्या या बरगडी संपून पोट सुरु होते त्या ठिकाणी आल्या पाहिजेत. कारण तेथे अनाहत चक्राचे स्थान असते. विशेष म्हणजे अनाहत चक्र हे मनाशी निगडीत असते.मंगळसुत्रातील वाटी ही गोलाकार असावी. कारण घुमट वाटीतून येणारी एनर्जी ही अनाहत चक्राला मिळते. त्यामुळे अनाहत चक्राची शक्ती वाढते. त्यामुळे मन शांत राहते व स्त्रीची आत्मिक शक्ती वाढते.
मंगळसूत्रामधील काळे मणी आणि वाट्यांचा आध्यात्मिक अर्थ काय?
मंगलसूत्राच्या दोन वाट्यांमध्ये एक वाटी शिवाची तर दुसरी वाटी शक्तीचे प्रतीक आहे. शिव-शक्तीच्या बळावरच सासरच्या मंडळींचे रक्षण आणि सांभाळ करावयाचा असतो. दोन वाट्यांना गुंफणारी तार ही माहेरच्या कुलदेवीची उपासना सोडून आता सासरच्या कुलदेवीची उपासना करण्यासंबंधी हिंदू धर्माने दिलेल्या पर्वांगीतील आदन- प्रदानाचे स्रोत मानली जाते. माहेरच्या वाटीत हळद, तर सासरच्या वाटीत कुंकू भरून कुलदेवीला स्मरून, मंगळसूत्राची पूजा करून मग गळ्यात घातले जाते.
ज्योतिष शास्त्रानुसार मंगळसूत्राचे महत्त्व अधिक आहे
ज्योतिष शास्त्रानुसार सोन्याला बृहस्पतिचा कारक मानला जातो. गुरु हा ग्रह वैवाहिक जीवनात सुखाचा कारक मानला जातो. शनीला काळे मोती मानले जाते. शनीला स्थिरतेचे प्रतिक मानले जाते. अशा प्रकारे मंगळसूत्रामुळे शनि ग्रहाच्या प्रभावामुळे वैवाहिक जीवनात स्थिरता आणण्याची शक्ती येते असे सांगितले जाते. तसेच स्त्रीच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा तिच्या पतिदेवासोबत सुखद जावा. यासाठी मंगळसूत्र परिधान केले जाते.