विधानसभेत आदित्य ठाकरे आणि आशिष शेलारांमध्ये जोरदार खडाजंगी, ‘या’ मुद्यावरुन भिडले

विधानसभेत आदित्य ठाकरे आणि आशिष शेलारांमध्ये जोरदार खडाजंगी, ‘या’ मुद्यावरुन भिडले

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या ४०० किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामात तब्बल ६ कोटींचा घोटाळा झाल्याचा वारंवार आरोप करत आहेत. हाच मुद्दा आता विधानसभेत सुद्धा उपस्थिकत करण्यात आला. ज्यामुळे आदित्य ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये सभागृहात जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला. आदित्य ठाकरे यांनी रस्त्यांच्या कामामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर आशिष शेलार यांनी सुद्धा गेल्या २५ वर्षांतील रस्त्यांच्या कामांबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज (ता. १३ मार्च) सभागृहात केली.

आजचे अधिवेशन सुरु झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी रस्त्यांच्या कामांमध्ये घोटाळा झाला असल्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “मुंबईतील ४०० किलोमीटर रस्त्यांच्या कामासाठी ६ हजार ८० कोटी रूपयांचा खर्च होणार आहे. मात्र, पावसाळ्याच्या पूर्वी ही कामे सुरू होणार का? किंवा पूर्ण होतील का? कामे सुरू झाली नाहीत तर आगाऊची रक्कम देऊ नये. कंत्राटदारांना ४८ टक्के अधिकची रक्कम आणि १८ टक्के जीएसटी हा विषय कसा घडला? याकडे अर्थमंत्र्यांनी लक्ष द्यावे,” असे यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले.

तर “महापालिकेने सांगितलं होतं, जिथे-जिथे रस्त्यांची कामं सुरू होतील, तेथील सीसीटीव्ही फुटेज आणि माहिती मिळेल. मात्र, अद्यापही याला सुरूवात झाली नाही. ते कधीपासून सुरू होणार?,” असा प्रश्न सुद्धा आदित्य ठाकरे यांच्याकडून यावेळी उपस्थित करण्यात आला.

हेही वाचा – आदित्य ठाकरे वाट्टेल ते बोलत आहेत, जनता त्यांना उत्तर देईल, शिंदेंच्या मंत्र्यांनी सुनावले

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार आशिष शेलार हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी प्रत्युत्तर देताना म्हंटले की, “४८ टक्क्यांचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण, राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या कंपन्या मुंबई शहरात आल्या. एखाद्या विशिष्ट कंपनीला काम मिळालं नाही. त्यामुळे ही पोटदुखी होत आहे. हे राजकारण आहे. भ्रष्टाचारी कंपनीला काम मिळाले नसल्यानेच ही पोटदुखी होत आहे.”

आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या घोटाळ्याच्या मुद्द्यावर चर्चा करताना आशिष शेलार यांनी “आम्ही चर्चेस तयार आहोत. रस्त्याच्या भ्रष्टाचाराबद्दल २५ वर्षाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी. गेल्या २५ वर्षात १२ हजार कोटी रूपये रस्त्यांवर खर्च झाले आहेत. त्याची चौकशी होऊन जाऊद्या,” असे म्हणत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

First Published on: March 13, 2023 5:23 PM
Exit mobile version