आसाममध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला दिसत आहे. कचार भागात ट्रेनमध्ये अडकलेल्या शेकडो प्रवाशांची हवाई दलाने सुटका केली आहे. अचानक आलेल्या पूर आणि भूस्खलनाने राज्यात लागोपाठ संकट वाढत आहे. अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वेचा संपर्क तुटला आहे. रविवारी, ASDMA ने कचर, करीमगंज, धेमाजी, मोरीगाव आणि नागाव जिल्ह्यांसाठी पुढील 12-72 तासांसाठी पुराचा इशारा जारी केला आहे.
मुसळधार पाऊस आणि पुरामुळे सिलचर-गुवाहाटी एक्स्प्रेस ट्रेन कचार भागात अडकली. परिस्थिती इतकी बिघडली होती की ट्रेन कुठेही पुढे किंवा मागे करता येत नव्हती. अनेक तासांपासून अडकून पडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने भारतीय हवाई दलाच्या मदतीने 119 जणांची सुटका केली आहे.
आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यात दरड कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) शनिवारी रात्री दिलेल्या माहितीनुसार, दिमा हासाओच्या हाफलांग राजस्व क्षेत्रात एका महिलेसह तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. राज्याच्या इतर भागांशी रेल्वे आणि रस्ते संपर्क तुटल्यामुळे अनेक ठिकाणी अचानक पूर आणि भूस्खलनामुळे डोंगरी जिल्ह्याला फटका बसला आहे.
अनेक रेल्वे गाड्या रद्द
आसाममध्ये संततधार पाऊस, भूस्खलनानंतर भारतीय रेल्वेने गाड्या रद्द केल्या आहेत. आसामच्या पाच जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये 25 हजार लोकं प्रभावित झाले आहेत. अरुणाचल प्रदेश ईटानगर आणि आसामच्या काही रेल्वे पूलांचे नुकसान झालं आहे. भूस्खलनात रेल्वेचा पूल वाहून गेला आहे. तसेच रेल्वेच्या पूलाचा भाग हवेत तरंगताना दिसत आहे. रेल्वेचा संपर्क तुटल्यामुळे बचावकार्य करण्यात अनेक अडथळे येत आहेत. 1400 प्रवासी प्रवास करत असलेल्या 2 रेल्वे गाड्या पूरस्थितीमुळे अडकल्या आहेत. या प्रवाशांची सुटका करण्यासाठी हवाई दल, एनडीआरएफ, आसाम रायफल्स आणि स्थानिक लोक प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा : Monsoon News : खूशखबर! मान्सून अंदमान निकोबार बेटांसह ‘या’ भागात दाखल होण्याची शक्यता