नवी दिल्ली – आर्थिक संकटातून बाहेर पडण्याकरता व्होडाफोन-आयडिया या टेलिकॉम कंपन्या एकत्र आल्या होत्या. मात्र, यांच्या एकत्रीकरणानंतरही कंपन्यांवरील कर्ज दूर झालेले नाही. त्यामुळे येत्या नोव्हेंबरपासून या कंपनीचे नेटवर्क बंद होऊ शकते. इंडस टॉवर्सचे सात हजार कोटींचे कर्ज थकल्याने नोव्हेंबरपासून टॉवर्सचे अॅक्सेस काढून घेण्यात येणार आहे, असा इशारा इंडसने कंपनीला दिला आहे. यामुळे ग्राहकांना नेटवर्क मिळू शकणार नाही.
हेही वाचा – कर्ज देणाऱ्या दोन हजार ॲप्सना गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले
देशभरातील टेलिकॉम कंपन्यांना टॉवरसाठी जागा भाड्याने देण्याचं काम इंडस टॉवर्स कंपनीकडून केलं जातं. व्होडाफोन-आयडिया या कंपनीलाही याच इंडसकडूनच टॉवर्ससाठी जागा उपलब्ध होते. मात्र, सात हजार कोटींचं कर्ज थकल्याने इंडस कंपनीने व्होडाफोन-आयडिया कंपनीला सोमवारी पत्र लिहून इशारा दिला असल्याचे वृत्त ईटीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. सोमवारीच इंडस टॉवर्सच्या मंडळाची बैठक पार पडली.
युकेमधील व्होडाफोन ग्रुप आणि भारतातील आदित्य बिर्ला ग्रुप यांनी एकत्र येऊन व्होडाफोन आयडिया ही कंपनी स्थापन केली आहे. या दोन्ही कंपन्या पूर्वी वेगवेगळ्या होत्या. परंतु आर्थिक संकटातून बाहेर पडण्याकरता या दोन्ही कंपन्या एकत्र आल्या. इंडस टॉवर्सचे सात हजार कोटी, अमेरिकन टॉवर कंपनीचे २ हजार कोटी रुपयांचं कर्ज या कंपनीवर आहे. तसंच, नोकियाचे तीन हजार कोटी आणि स्वीडनच्या एरिक्सन कंपनीचे एक हजार कोटी रुपयांचं देणं बाकी आहे. कंपनी कर्ज आणि इक्विटीच्या माध्यमातून २० हजार कोटी उभे करण्याचा प्रयत्न करत आहे.
हेही वाचा – कर्मचाऱ्यांना मिळणार वीजबील भरण्यासाठी १८ हजार रुपये, ‘या’ कंपनीचा निर्णय
व्होडाफोन आयडिया ही टेलिकॉम कंपनी देशातील तीन नंबरची टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेलसोबतच व्होडाफोन आयडियाला २५.५ कोटी ग्राहक आहेत. रिलायन्स जिओ आणि एअरटेलने फाईव्ह जी सेवा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. व्होडाफोन-आयडियानेही घोषणा केली आहे. मात्र, त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता फाईव्ह जी साठी टॉवर उभे करण्याकरता कंपनीकडे पैसे नाहीत. त्यामुळे फाईव्ह जी ची सेवा मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे.