नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शासकीय विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे 71,000 उमेदवारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नियुक्ती पत्रांचे वितरण केले. रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे वचन पंतप्रधानांनी दिले आहे. नियमितपणे आयोजित होत असलेले हे रोजगार मेळावे म्हणजे आपल्या सरकारची एक ओळखच आहे. सरकार जे संकल्प करते, ते प्रत्यक्षातही साकारून दाखवते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीशासित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नियमितपणे रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत, त्यामुळे येत्या काळात नवीन लाखो कुटुंबांतील सदस्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्ती मिळेल. येत्या काळात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तराखंड ही राज्येही अशा मेळाव्यांचे आयोजन करणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.
Addressing the Rozgar Mela. Best wishes to the newly inducted appointees. https://t.co/1jA5ocfXdH
— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2023
या भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि गतिमानता हे आजच्या सरकारी कामकाजाच्या प्रत्येक पैलूचे वैशिष्ट्य आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, एक काळ असा होता जेव्हा नियमित पदोन्नतींनाही विलंब होत असे आणि त्या वादात अडकवल्या जात असत. मात्र, या सरकारने अशा समस्यांचे निराकरण करत ही प्रक्रिया अधिक पारदर्शक केली. नव्याने नियुक्त झालेले बहुतांश उमेदवार हे सर्वसामान्य पार्श्वभूमीचे आहेत आणि अनेक जण हे त्यांच्या कुटुंबातील पाच पिढ्यांत पहिल्यांदाच सरकारी नोकरी मिळवणाऱ्यांपैकी एक आहेत. ही बाब सरकारी नोकरी मिळविण्यापेक्षा अधिक मोठी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
अनेक नवनियुक्त कर्मचारी सरकारचे थेट प्रतिनिधी म्हणून सामान्य जनतेशी संवाद साधतील. ‘ग्राहक हा नेहमीच योग्य असतो’, या व्यापार-उद्योगजगतातील म्हणीशी साधर्म्य दाखवत आपणही ‘नागरिक नेहमीच बरोबर असतो’ हा मंत्र प्रशासनात राबवायला हवा. यामुळे सेवाभावी भावना वाढीस लागते आणि ती बळकटही होते, असे मोदी यांनी नमूद केले. झपाट्याने बदलणाऱ्या भारतात, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वेगवान विकासामुळे स्वयंरोजगाराच्या संधींचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत आहे. आजचा भारत याचा साक्षीदार आहे, असेही त्यांनी सांगितले.