Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातात 288 लोकांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता

Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातात 288 लोकांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली : ओडिशातील (Odisha) बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी (2 जून) संध्याकाळीत साडेसातच्या सुमारास तीन ट्रेनचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 900 प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारतातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. (233 people died in Odisha train accident)

शुक्रवारी संध्याकाळी बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस (Coromondel Express) आणि मालगाडीची (freight train) धडक झाल्याची माहिती समोर आली होती. पण ओदिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी तीन गाड्यांचा समावेश असल्याचे सांगितले आहे. बहनगा स्टेशनजवळ घडलेल्या या अपघातानंतर आतापर्यंत 18 गाड्या रद्द करण्यात आल्या तर अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले की, बालासोर जिल्ह्यात 200 हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत, तर ओडिशातील अग्निशमन विभागाचे महासंचालक सुधांशू सारंगी यांनी सांगितले की, आतापर्यंत 207 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या भीषण अपघातानंतर भुवनेश्वर आणि कोलकाता येथून बचाव पथके आणि एनडीआरएफ, राज्य सरकारची पथके आणि हवाई दलही दुर्घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून बचाव कार्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत.

या अपघाताची चौकशी करण्यासाठी उच्च समिती गठीत
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सकाळी दुर्घटनास्थळी जाऊन परिस्थीतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अपघातासंबंधी माहिती दिली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, या प्रकारचा मोठा पहिल्यांदा झाला आहे. त्यामुळे जेवढे प्रयत्न करू तेवढे कमी आहेत. या अपघात मृत्यू झालेल्या नागरिकांसाठी मी प्रार्थना करतो आणि सर्व जखमी झालेल्या नागरिकांना कटक, भुवनेश्वर, कलकत्ता कुठेही जिथे चांगली आरोग्य सेवा दिली जाईल. या अपघातात जखमी आणि मृत्यू नागरिकांसाठी काल रात्रीच मदत जाहीर करण्यात आली आहे. या अपघाताची चौकशी करण्यासाठी एक उच्च समिती गठीत केली आहे. कमिशनर रेल्वे कमिटीलाही बोलवण्यात आले आहे. तेही चौकशी करतील. या अपघात कसा झाला याची माहिती घेतली जाईल. आता सर्व फोकस बचाव करण्यावर आहे. या अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे, त्यांना चांगल्या रुग्णालयात पाठवून त्यांच्यावर उपचार केले जातील आणि त्यांच्या नातेवाईकांपर्यंत त्या रुग्णांची माहिती पोहचवली जाईल, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.

दु:खाच्या प्रसंगी माझे विचार शोकाकुल परिवारासोबत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ओडिशातील रेल्वे अपघातामुळे व्यथित झाल्याचे म्हटले आहे. मोदी म्हणाले की, या दु:खाच्या प्रसंगी माझे विचार शोकाकुल परिवारासोबत आहेत. जखमी लवकर बरे होवोत. रेल्वेमंत्र्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. दुर्घटनेच्या ठिकाणी बचावकार्य सुरू असून बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे.

जखमींसाठी मी प्रार्थना करते
राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी ट्वीट करत म्हटले की, बालासोर, ओडिशा येथे झालेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल जाणून घेऊन खूप दुःख झाले. माझे हृदय शोकाकुल कुटुंबियांसोबत. बचाव कार्य यशस्वी व्हावे आणि जखमी लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करते.

राहुल गांधींकडून ट्वीट
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करून बालासोर, ओडिशा येथे कोरोमंडल एक्सप्रेसला झालेल्या अपघाताच्या दुःखद बातमीने दुःख झाल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले की, माझे हृदय शोकाकुल कुटुंबियांसोबत. जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी. मी काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना विनंती करतो की त्यांनी बचाव कार्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करावे.

अपघात नेमका कशामुळे झाला?
कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाचवेळी एकाच रुळावर आल्याने हा अपघात झाल्याचे समजते. सिग्नल यंत्रणेतील खराबीमुळे दोन्ही गाड्या एकाचवेळी एका रुळावर आल्याचे सांगितले जात आहे. कोरोमंडल एक्सप्रेस ही चेन्नई ते पश्चिम बंगालमधील हावडामार्गे ओडिशापर्यंत धावते.

First Published on: June 3, 2023 8:25 AM
Exit mobile version