‘मुलींवर संस्कार करणं आई-वडिलांचं कर्तव्य’; बलात्कार प्रकरणी भाजपा आमदाराचे वक्तव्य

‘मुलींवर संस्कार करणं आई-वडिलांचं कर्तव्य’; बलात्कार प्रकरणी भाजपा आमदाराचे वक्तव्य

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. हाथरस या ठिकाणी एका युवतीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर तिच्यावर हल्लाही झाला. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरात तीव्र पडसाद उमटले. सध्या योगी सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे दिले आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकार, भाजपा आणि मोदी सरकारवर टीका देखील केली जात आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी झालेल्या सामूहिक बलात्काराचे प्रकरण ताजं असतानाच भाजपा आमदाराने या प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. चांगले संस्कारच बलात्कार रोखू शकतात असे वक्तव्य भाजपाचे बलियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केलं आहे.

अशा परिस्थितीत भाजपा आमदार सुरेंद सिंह यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, “मी फक्त एक आमदार नाही तर एक चांगला शिक्षकही आहे. त्यामुळे मी हे सांगतो आहे की आपल्या मुलींवर चांगले संस्कार घडवा. फक्त कायदा आणि शिक्षा बलात्कारासारख्या घटना रोखू शकत नाहीत. तर चांगले संस्कार बलात्कार रोखू शकतात. गुन्ह्यांवर वचक ठेवणं हे सरकारचं काम आहे यात शंकाच नाही. मात्र मुलींवर चांगले संस्कार घडवणं त्यांना शालीन राहण्यास शिकवणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे” दरम्यान या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची देखील शक्यता आहे.

योगींना बांगड्या कधी पाठवणार? 

हाथरस प्रकरणावरुन कॉंग्रेसने केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर जोरदार हल्ला चढविला आहे. हाथरस घटनेनंतर त्या मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना बांगड्या देणार आहेत का? असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. दरम्यान, आज स्मृती इराणी यांनी आज पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर हाथरस दौऱ्यावरुन निशाणा साधला. स्मृती इराणींच्या प्रतिक्रियेनंतर काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे.

यूपीएचं सरकार असताना निर्भया प्रकरणाने देश हादरला होता. यावेळी भाजच्या नेत्या आणि आताच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवल्या होत्या. त्यावरुन आता काँग्रेसने निशाणा साधला आहे. कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करुन त्यांच्यावर हल्ला केला. सुरजेवाल म्हणाले, “श्रीमती स्मृती इराणी, मला सांगा आदित्यनाथ यांना कधी बांगड्या भेट करायला जाणार?”

First Published on: October 4, 2020 11:13 AM
Exit mobile version