हाथरस घटनेवरुन राजकारण चांगलच तापलं आहे. हाथरस प्रकरणावरुन कॉंग्रेसने केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर जोरदार हल्ला चढविला आहे. हाथरस घटनेनंतर त्या मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना बांगड्या देणार आहेत का? असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. दरम्यान, आज स्मृती इराणी यांनी आज पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर हाथरस दौऱ्यावरुन निशाणा साधला. स्मृती इराणींच्या प्रतिक्रियेनंतर काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे.
यूपीएचं सरकार असताना निर्भया प्रकरणाने देश हादरला होता. यावेळी भाजच्या नेत्या आणि आताच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवल्या होत्या. त्यावरुन आता काँग्रेसने निशाणा साधला आहे. कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करुन त्यांच्यावर हल्ला केला. सुरजेवाल म्हणाले, “श्रीमती स्मृती इराणी, मला सांगा आदित्यनाथ यांना कधी बांगड्या भेट करायला जाणार?”
श्रीमती स्मृति ईरानी जी,
सिर्फ़ इतना बताइये !
आदित्यनाथ को चूड़ियाँ भेंट करने कब जाएँगी?#Hathras #HathrasHorrorShocksIndia
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) October 3, 2020
दरम्यान, स्मृती इराणी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींच्या हाथरस दौऱ्यावर भाष्य केलं. स्मृती इराणी म्हणाल्या की, जनतेला हे समजले आहे की राहुल गांधींचा हाथरस दौरा हा राजकारणासाठी आहे, न्यायासाठी नाही. जनतेला कॉंग्रेसचे डावपेच समजतात, त्यामुळे भाजपला ऐतिहासिक विजय मिळावा, असा निर्णय २०१९ मध्ये जनतेने घेतला.
कुटुंबाची नार्को टेस्ट हा मुर्खपणा
यापूर्वी सुरजेवाला यांनी हाथरस पीडित कुटुंबाची नार्को टेस्ट करण्याच्या यूपी सरकारच्या निर्णयावर हल्ला केला होता. सुरजेवाला यांनी ट्वीट केलं की, “हाथरस येथील पीडित दलित कुटुंबाची नार्को टेस्ट केल्याची बातमी आदित्यनाथ सरकारच्या मुर्खपणाचा जिवंत पुरावा आहे, पीडित मुलीवर उपचार केले गेले नाहीत ना तिला न्याय मिळाला, रात्री अडीच वाजता पीडित मुलीच्या मृतदेहाचं दहन केलं. वडिलांना धमकावलं. मोबाईल काढून घेतला. मीडिया गावात जाऊ शकत नाही. अधर्मी योगींनी राजीनामा द्या.”