पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘शाहीनबाग आंदोलन हे नियोजित कटकारस्थान’!

पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘शाहीनबाग आंदोलन हे नियोजित कटकारस्थान’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी

एकीकडे शाहीन बागेमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलक आंदोलन करत असताना दुसरीकडे देशाचे पंतप्रधान मात्र हे आंदोलन म्हणजे कटकारस्थान असल्याचा आरोप करत आहेत. दिल्लीमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून येत्या ८ फेब्रुवारीला तिथे मतदान होणार आहे. यासाठी जीडीबी करकरडूमा मैदानात आयोजित केलेल्या प्रचारसभेमध्ये मोदींनी हे आंदोलन म्हणजे आपचं षडयंत्र असल्याचा आरोप केला. तसेच, पुढे देशातील इतर रस्ते देखील बंद केले जातील, अशी भिती देखील बोलून दाखवली.

काय म्हणाले पंतप्रधान?

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आपली पहिली प्रचारसभा घेण्यासाठी भाजपच्या जीडीबी मैदानावरील प्रचारसभेमध्ये दाखल झाले. यावेळी बोलताना त्यांनी सीएएविरोधातील आंदोलनांच्या मागे आप आणि काँग्रेस असल्याचा आरोप केला. ‘सीलमपूर, जामिया किंवा शाहीनबाग या ठिकाणी सीएएविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांमागे राजकारण आहे. हा फक्त कायद्याला विरोध असता, तर सरकारच्या आश्वासनांनंतर तो बंद व्हायला हवा होता. पण आम आदमी पक्ष आणि काँग्रेस व्होटबँकेचं राजकारण करत आहेत. संविधानाच्या नावाखाली खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष हटवलं जात आहे. पण सीएएविरोधातील आंदोलक त्याच कायदेमंडळाने दिलेला निर्णय मानत नाहीत’, असं मोदी यावेळी म्हणाले.


हेही वाचा – जामियानंतर आता शाहीनबागमध्ये आंदोलकांवर गोळीबार!

दिल्लीत काय घडतंय?

शाहीनबागमधील आंदोलन आता ५० दिवसांहून जास्त काळ सुरू आहे. मोठ्या संख्येनं मुस्लीम महिला या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. सीएए कायदा मागे घ्यावा आणि एनआरसीची देशात अंमलबजावणी होणार नाही असं लेखी आश्वासन सरकारने द्यावं, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. एकीकडे पंतप्रधान मोदी एनआरसीबद्दल कोणतीही चर्चा न झाल्याविषयी सांगत असतानाच दुसरीकडे अमित शहा मात्र एनआरसीबद्दल आग्रही असून त्याचा प्रचार देखील करत असल्यामुळे आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

First Published on: February 4, 2020 8:39 AM
Exit mobile version