दिल्लीमध्ये गेले चार दिवस सीएए कायद्यावरुन हिंसाचार झाला. यावर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांनी सुनावणी केली. यावेळी चिथावणीखोर विधाने आणि भाषणे करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर गुन्हे का दाखल केले नाहीत? असा सवाल करत दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांनी दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढले. त्यानंतर न्यायमूर्ती मुरलीधर यांची बदली झाली. त्यांच्या बदलीला केंद्र सरकारला जबाबदार धरत राजकीय विरोधकांनी टीका केली आहे. या प्रकरणावरून कांग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी न्यायमूर्ती लोया यांच्या हत्येच्या विषयावरून ट्विट केले आहे.
हेही वाचा – दिल्ली हिंसाचार दंगल नसून हल्ला – प्रकाश आंबेडकर
दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, शंभरहून अधिक जखमी झाले आहेत. या हिंसाचाराप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या दंगलीसंदर्भातील याचिकेवर न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायमूर्ती मुरलीधर यांनी दिल्ली पोलिसांची चांगलीच कानउघडणी केली. त्यानंतर बुधवारी रात्रीच मुरलीधर यांची बदली करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीवरून राजकीय नेत्यांनी आणि संघटनांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीच्या पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांनी, “शूर न्यायमूर्ती लोया यांची आठवण येत आहे, ज्यांची बदली झाली नव्हती,” असं ट्विट केले आहे.
Remembering the brave Judge Loya, who wasn’t transferred.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 27, 2020