देशभरात महाराष्ट्रातील भाजप- शिंदेगट विरुद्ध शिवसेनेचा सत्तासंघर्ष चर्चेत असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर खळबळजनक विधान केले आहे. शिंदे सरकार हे अवैध असून उद्धव सरकार पाडण्यासाठी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पैशांव्यतिरिक्त बरंच काही देण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
ममता या इंडिया टुडे कॉन्क्लेव ईस्टमध्ये बोलत होत्या. (India Today Conclave East).यावेळी त्यांना महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर विचारण्यात आले. त्यावर ममता यांनी महाराष्ट्रात आलेले शिंदे सरकार हे अवैध आहे, त्यांनी सत्ता जिंकली पण महाराष्ट्राचे मन मात्र त्यांना जिंकता आले नाही. तसेच बंडखोर आमदारांना फक्त पैसेच देण्यात आले नाहीत. तर त्याशिवाय बरंच काही देण्यात आलयं असेही त्या म्हणाल्या. यावर ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी बरंच काही म्हणजे काय असा सवाल केला. त्यावर ममता यांनी बऱ्याचवेळा गप्प राहणं हे सोनं आणि बोलणं चांदीसारखं असतं असंही म्हटलं.
महाराष्ट्रातील सत्तासंर्घषापासूनच ममता बॅनर्जी सातत्याने केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधत आहेत. याचपार्श्वभूमीवर त्यांनी पुढील निवडणुकांमध्ये जनता भाजपसाठी बुलडोझर ठरणार असल्याचेही म्हटंल आहे. तसेच अशाप्रकारे सूडबुद्धीने राजकारण करणारे सरकार आपण कधीही बघितले नाही असेही ममता यांनी यावेळी म्हटले आहे.