आनंदाच्या शिधापत्रिकेत ओल्या दुष्काळाचा विसर!

आनंदाच्या शिधापत्रिकेत ओल्या दुष्काळाचा विसर!

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही आनंदाच्या शिधापत्रिकेसाठी रांगेत उभ्या राहणार्‍या व्यक्तींच्या चेहर्‍यावरील भाव हे आनंदाचे नाहीत तर, महागाईच्या मार्गावर चालून पायाला फोड आणि हाताला चटके बसलेले आहेत. त्यांना पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न नित्याचा वाटतो. त्यात हे आकाश कंदील, पणत्या, फटाके वगैरे म्हणजे श्रीमंतांचे चोचले वाटतात. गरीब आणि श्रीमंतामधील दरी मिटल्याशिवाय सण, उत्साहाला तरी काय अर्थ उरतो. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे कृषीमंत्री सांगतात. मंत्रिपदासाठी आयुष्याचे राजकारण पणाला लावणारे मंत्री शेतकर्‍यांचे अश्रू काय पुसणार! त्यांना तर खूर्चीच प्रिय वाटणार!

दिवाळीच्या मंगलमय वातावरणात सकारात्मक गोष्टींवर चर्चा व्हायला हवी. परंतु, शेतकर्‍यांचे आयुष्य धुवून टाकणारा अवकाळी पाऊस असेल किंवा महागाईमुळे नैराश्य पदरी पडलेल्या लोकांचे दु:ख असो ते कमी व्हायला हवे. आपल्याकडे कुठल्याही गोष्टीला कालांतराने राजकीय स्वरुप प्राप्त होते. यातून प्रश्न सुटतही नाही, पण समस्या मात्र ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ होऊन बसते. आनंदाच्या शोधात फिरणारे सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी असोत की कामगार असोत, त्यांच्या आयुष्यात आनंदाचा दिवा पेटावा यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करणार्‍या लोकांचा दुष्काळ संपलेला नाही. हा दुष्काळ संपण्याची वाट प्रत्येकजण राजकीय पुढार्‍यांकडे बघतो. पण राजकीय नेते असोत किंवा प्रशासकीय उच्चपदस्थ अधिकारी हे त्या सिस्टिमचा भाग बनतात आणि कामकाजाला सुरुवात होते. एक नेता गेला काय आणि दुसरा आला काय सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यात आजवर फारसा बदल झालेला नाही. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही आनंदाच्या शिधापत्रिकेसाठी रांगेत उभ्या राहणार्‍या व्यक्तींच्या चेहर्‍यावरील भाव हे आनंदाचे नाहीत तर, महागाईच्या मार्गावर चालून पायाला फोड आणि हाताला चटके बसलेले आहेत. त्यांना पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न नित्याचा वाटतो. त्यात हे आकाश कंदील, पणत्या, फटाके वगैरे म्हणजे श्रीमंतांचे चोचले वाटतात. गरीब आणि श्रीमंतामधील दरी मिटल्याशिवाय सण, उत्साहाला तरी काय अर्थ उरतो. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे कृषीमंत्री सांगतात. मंत्रिपदासाठी आयुष्याचे राजकारण पणाला लावणारे मंत्री शेतकर्‍यांचे अश्रू काय पुसणार. त्यांना तर खूर्चीच प्रिय वाटणार.

बांबूच्या काड्यांपासून बनवलेली पाटी डोक्यावर घेवून गावा-गावात पायी फेरफटका मारुन सासूरवासीनींची पोत ओवणारी, टिकली, बांगडी अन् क्लिपा पुरवणारी महिला म्हणजे वैदिनी. तिच्या या पाटीभर भांडवलाच्या व्यवसायावर तिच्या स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत होता. एखाद्या महिलेकडे पैसे नसतील तर तिला आठवड्याची सवलतही देण्याची क्षमता या वैदिनीमध्ये होती. वाढत्या महागाईमुळे वैदिनीचे अर्थशास्त्र तर बिघडले पण सर्वसामान्य जनतेचे जगणेही अवघड झाले आहे. गावात येऊन आपला छोटासा व्यवसाय चालवणारी बोहारिण फक्त पैशांसाठीच काम करत नसे. तर तिला गावातच जेवणही मिळत होते आणि धान्यही. त्यामुळे तिच्या व्यावसायातून संपूर्ण कुटुंब निर्धास्तपणे जगत होते. हळुहळु तंत्रज्ञानाचा विकास होत गेला आणि शेतीचे अर्थकारणही बदलत गेले. भाजीपाला, फळपिकांचे उत्पादन वाढत गेले त्याप्रमाणात शेतकर्‍यांकडे पैसा वाढत गेला. आपल्या गरजा भागवण्यासाठी शेतकरी गावातून तालुक्याला नियमितपणे येऊ लागला आणि येथूनच तो वस्तूंची खरेदी करु लागला.

त्यामुळे गावातील अर्थचक्राला शहरातील व्यावसायिकांची जोड मिळू लागली. पर्यायाने गावापर्यंत मर्यादित असलेल्या गरजा शहरांपर्यंत जावून पोहोचल्या. पूर्वी महिनोनमहिने शहरात न गेलेल्या महिला आता महिन्यात एक-दोनदा शहरात जायला लागल्या. त्यातून कुटुंबाचा खर्च वाढला; परंतु, वैदिनीचे अर्थशास्त्रही बिघडले. जीवन जगण्याच्या पध्दतीतच बदल झाल्याने खर्चचे प्रमाण वाढत गेले आणि उत्पन्न कमी झाले. शेती आहे तेवढीच आहे किंवा कमी झाली. पण त्यातून मिळणार्‍या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचे प्रमाण वाढले. यातून शेतकर्‍यांच्या समस्या निर्माण झालेल्या दिसतात. मर्यादित उत्पादन व वाढता खर्च भागवताना शेतकर्‍यांचे आयुष्य पणाला लागते. या व्यूव्हचक्रातून सुटण्यासाठी अनेक उपाय शेतकर्‍यांनी केले. पण व्यवसायाशिवाय दुसरा शाश्वत पर्याय सापडलेला नाही.

उत्पादित माल कुठल्या भावाने विकला जाईल, याची त्यांनाही खात्री नसल्यामुळे कुठले पीक घ्यायचे याविषयी माहिती नसते. परतीच्या पावसाने सर्वाधिक नुकसान हे कपाशी व सोयाबिन या पिकांचे झाले आहे. वैदिनीच्या अर्थकारणातून आपल्याला एकच शिकवण मिळाली होती की, धान्य दिले तरी त्याबदल्यात आपल्या गरजा भागत होत्या. धान्य घेण्यासाठी घरापर्यंत लोक येत होते. म्हणजे आपल्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार आपल्याला होता. परंतु, आता आपण धान्य बाजारात घेऊन जातो तरी आपल्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार आपल्याला राहिलेला नाही. दुसरी गोष्ट पूर्वी आपल्या गरजा कमी असल्यामुळे सासूरवासी महिलांना माहेरकडून मिळालेले चार-दोन रुपये सांभाळून ठेवण्याची सवय होती. वर्षानुवर्षे पैसे तसेच साठवून ठेवल्यामुळे काटकसरीत जीवन जगण्याची सवय जडली होती. वैदिन घरासमोर आली आणि सासू घराबाहेर उभी असेल तर सून तिला मागच्या दाराला येण्यास सांगायची.

सासूने काय घेतले हे सूनेला माहीत होत नव्हते आणि सूनेने काय घेतले हे सासूला कळत नव्हते. त्यामुळे दोघांविषयीची गुप्तता पाळण्यातच वैदिनीचे अर्थकारण दडले होते. आपल्याकडे काही वस्तू आहे, हे दाखवण्याची पूर्वी हौस नव्हती. आता त्याची स्पर्धा सुरू झाली आहे. ‘सासू एक नंबरी तर सून दस नंबरी’ असे उपरोधिकपणे म्हटले जाते. त्यातूनच सासू आणि सून यांच्यातील भांडणांची सुरुवात झालेली दिसते. सारख्या सूचना म्हणजे ‘सासू’ आणि सूचना नको म्हणजेच ‘सून’ अशा अर्थाने ही नावे घेतली जातात. एकत्र कुटुंबपद्धती लयास जाण्यामागे शिक्षण हा एक फार मोठा घटक कारणीभूत समजला जातो.

सणावाराला वैदिनीच्या घरीही पुरणपोळी व आंबेरसाचा बेत होऊ लागला. घरी आंबेरस केला नाही तरी गावातून तिला पोळ्या आणि रस हमखास मिळेल, याची खात्री तिला होतीच. पण वाढत्या शहरीकरणासोबत खर्चही वाढला आणि आवडीनिवडी बदलत गेल्या. गावात शिवून मिळणारी पोत आता सोनाराच्या दुकानात गेली. त्याला सोनेरी साज चढला. शेतात आता भाजीपाला, ऊस, कांदे, मका, द्राक्ष अशी नगदी पिके होऊ लागल्याने हाती चारपैसे यायला लागले. परिणामी, चारचाकी गाडीत फिरणे, ट्रॅक्टरने शेती नांगरणे, पिकांवर महागड्या औषधांची फवारणी होऊ लागल्याने खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला. वाढत्या खर्चासोबतच शेतकर्‍यांचे आर्थिक गणितही बिघडत गेले. शहरापर्यंत मर्यादित असलेल्या महागाईच्या झळा आता गावातील शेतकर्‍याला सोसाव्या लागत आहेत. 350 रुपयांचा गॅस आता एक हजारांवर पोहोचला आहे. शेतकर्‍यांच्या खात्यावर वार्षिक दोन हजार रुपये येणार याचा गावभर गाजावाजा करणार्‍या केंद्र सरकारने गॅसची सबसिडी कधी काढून घेतली हे कुणालाही कळले नाही.

गॅस महागल्याने अगोदरच करपलेल्या भाकरीवर इंधनाच्या भडक्याने तेल ओतले. पेट्रोल शंभर रुपयांवर कधीच पोहोचले आहे. इंधन दरवाढीचा परिणाम महागाईवर झाला आहे. चहापासून ते घरांच्या किमतींपर्यंत सर्वांचे दर गगणाला भिडले आहेत. सिमेंट, स्टीलचे भाव दुप्पट झाल्यामुळे घरांचे स्वप्न महागले. कोरोनानंतरच्या काळात अचानक आलेल्या महागाईचा सामना करताना सर्वसामान्य कुटुंबाचे हाल होताना दिसतात. या तुलनेत शेतकरी असतील किंवा शहरातील मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात फारसा फरक पडलेला नाही. किंबहुना, घटच झालेली दिसते. त्यामुळे महागाईचे चटके त्यांना जास्त बसत आहेत. महागाईच्या तुलनेत अनेकांचे वेतन अत्यंत तुटपुंजे आहे. महिला शिक्षित झाली आणि दोन्ही घरांची प्रगती झाली. परंतु, घरापर्यंत मर्यादित असलेल्या महिला आता नोकरी करतात. स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्यामुळे त्यांना कुणाची गरज वाटत नाही. ‘स्वावलंबी’ या नावाखाली त्या स्वत:च्या मर्यादित जगात वावरु लागल्या आणि त्यांना बंधने नको वाटू लागली. सासू, सासरे हे तर अडचणीचे ठरत असल्याने लग्नानंतर तातडीने विभक्त होण्याचे प्रकार अलिकडील काळात फार वाढले आहेत. त्यातून स्वत:चा संसार आणि मुले यातच महिला धन्यता मानतात. एकत्रित कुटुंबपध्दतीचे गुण त्यांना कधी माहीत पडलेच नाहीत. स्वत:च्या मर्जीप्रमाणे खर्च करणार्‍या महिलांचे प्रमाण वाढल्याने पुरुषांचे आर्थिक समीकरण बघिडले आहे. विशेषत: मध्यमवर्गीय पुरुष हे महागाईच्या झळा सोसत आहेत.

जागतिक मंदीच्या काळातही भारताला आर्थिक झळ फारशी बसली नाही, यामागे वैदिनीचे अर्थशास्त्र हा फार महत्वाचा घटक होता. काटकसरीचे आयुष्य जगण्याची सवय ही फार अडचणींना जन्माला घालत नाही. उधळपट्टी करण्याची सवय पाश्चात्य देशातील नागरिकांना असल्यामुळे जागतिक मंदीत त्यांची दिवाळखोरी निघाली. कोरोनानंतरचा काळ हा अशाच स्वरुपाचा आहे. त्यानंतर आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या देशांमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली. भारताशेजारील श्रीलंका, पाकिस्तान हे देश डबघाईस आले. भारतातील जनता महागाईच्या झळा सहन करत जगते आहे. अर्थतज्ज्ञ महागाईचे विश्लेषण करतील; परंतु, सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आपण सरकारवर दोष देऊन मोकळे होऊ. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युध्दाचे परिणाम म्हणून इंधन दरवाढ झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आपण इतर देशांवर किती प्रमाणात अवलंबून आहोत, याचाही अंदाज येतो. अर्थशास्त्रात ‘प्रॉडक्ट’ म्हणजे वस्तू आणि ‘सर्व्हिसेस’ म्हणजे ‘सेवा’ अशा संज्ञा वापरल्या जातात. आता आपली अर्थव्यवस्था ‘सर्व्हिस सेक्टर’वर आधारीत आहे. हा व्यवहार तर थेट वैदिनीच्या व्यवहाराशी मिळताजुळता आहे. वैदिनी तिच्याकडच्या वस्तू बनवत नाही. ती फक्त ‘एक्स्चेंज’ करते. पोत ओवण्याची कला फक्त तिला अवगत होती. परंतु, काळानुरुप व्यवसाय बदलत गेला तसे तिने मार्केटिंगचा नवा फंडा वापरला.

जुने कपडे घेवून भांडी देणे, केसांवर फुगे विकण्याचा व्यावसाय तिने स्वीकारला आहे. त्यामुळे तिच्याकडे थोड्याफार प्रमाणात पैसा येऊ लागला आहे. अशाच स्वरुपाचे अर्थशास्त्र सर्वांचे बदललेले बघायला मिळते. ग्रामीण भागात पिकवले जाणारे धान्य शहरातील व्यक्तींना खायला हवे आहे, पण अगदी स्वस्तात. याउलट कपडे ब्रॅण्डेड हवेत. मॉल्समध्ये जावून खरेदी करताना महागाईचा विसर पडत चाललेल्या नागरिकांना क्रेडिट कार्डच्या आभासी जगात कर्जाची भीती वाटत नाही. बचत करण्यापेक्षा आपण अधिक श्रीमंत आहोत याचे प्रदर्शन करण्याची संस्कृती वाढीस लागल्याने आर्थिक घडी विस्कटली आहे. वैदिनीच्या अर्थशास्त्रातून बोध घेण्यापेक्षा आपण उधळपट्टी स्वीकारली. त्यामुळे महागाईच्या झळा सहन होत नसताना खर्च कमी केला नाही तर एक दिवस दिवाळखोरीत गेल्याशिवाय राहणार नाही.

दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना परतीच्या पावसाने केलेल्या उत्पातामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांना फक्त राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना सरकार अजूनही ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे सांगते. शेतकर्‍यांप्रती त्यांना वाटत असलेली आपुलकी यातून दिसून येते. स्वत: सूरतमार्गे गुवाहाटी, गोवा फिरुन आल्यानंतर मित्रपदाची खिरापत मिळाली. पण हाती असलेले पीक अजूनही उभे आहे म्हणून ओला दुष्काळ जाहीर करायचा नाही, हा दुटप्पीपणा नव्हे तर काय?

First Published on: October 23, 2022 10:16 PM
Exit mobile version