‘एकजण म्हणतात मी परत येईन अन् दुसरे म्हणतात परत जाईन’; अजित पवारांची फटकेबाजी

‘एकजण म्हणतात मी परत येईन अन् दुसरे म्हणतात परत जाईन’; अजित पवारांची फटकेबाजी

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांचं सरकार नसल्यामुळे अस्वस्थ झाले आहेत. एकजण म्हणत होते, मी पुन्हा येईन, ते दुर्दैवाने जमलं नाही. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन. परत जाईन म्हणणाऱ्यांना पुणेकरांनी बोलावलं नव्हतं, असा टोला अजित पवारांनी लगावला. वास्तविक म्हणजे आमच्या बहिण मेधा कुलकर्णी नाराज झाल्या. कार्यकर्ते नाराज झाले. कारण तुम्ही Mlc होता. अर्थात तुमच्या पक्षातून कुठून उभं राहायचं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. परंतु एक वर्ष होईपर्यंतच जाईन म्हणायला लागले. लोकांनी पाच वर्षासाठी निवडून दिलं आहे. कोथरुडची अपेक्षा की तिथली कामं व्हावीत. लगेचच परत जायची भाषा करायला लागले तर उद्या जर लोकं काम घेऊन गेली तर ते म्हणतील मी परत जाणार आहे…मी परत जाणार आहे. अरे मग आलात कशाला? तिथेच कोल्हापुरला थांबायचं होतं.

शेतकऱ्यांबदल हे आंदोलन करतात, यांना दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी जमा झाले आहे, हे दिसत नाही. ते शेतकरी का जमा झाले आहेत. त्यांनी आपआपल्या घरी जाऊन आपली शेती करावी. त्यासाठी त्यांच्या काय मागण्या आहेत? यावर चर्चा करायला नको. यांनी शेतकऱ्यांच्या बाजून निर्णय घेतले आहेत. तर शेतकरी रस्त्यावर का आला? शेतकरी एवढ्या कडक थंडीमध्ये आंदोलन का करत आहे. याचं आत्मपरिक्षण, आत्मचिंतन त्यांनी करावं. इथे काल बैलगाडीवर बसून फोटो काढले. त्याऐवजी दिल्लीत जाऊन त्या शेतकऱ्यांशी चर्चा करा, असं अजित पवार म्हणाले.

यावेळी अजित पवार यांनी मेगाभरतीवर भाष्य केलं. मी भाजपचे आमदार राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत, असं म्हटलं नाही. मी त्यावेळेस सभागृहात म्हटलं ते जगजाहीर आहे. काळजी घ्या, तुम्ही मागच्यावेळेस फोडाफोडी केली आहे. ते कशासाठी गेले तर आपलं सरकार येणार नाही, भाजपचं सरकार येणार आहे, तसेच कामासाठी गेले. आता जे कामासाठी गेले त्यांची कामं तिकडे झाली नाहीत, तर ते कामासाठी दुसरीकडे जातील. एवढंच म्हटलं. तीन-चार महिन्यांत काही गोष्टी घडू शकतात. तो ही त्यांना राग आला. इतर पक्षातले आमदार घेताना त्यांना उकाळ्या फुटत होत्या. तेव्हा बरं वाटत होतं. आता कसं वाटतंय तर आता गार गार वाटायला लागलं, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

मराठा आरक्षण

“कोणताही निर्णय घेतला तरी त्यात दोन मतप्रवाह दिसतात. काहीजण निर्णयाचं समर्थन करु शकतात तर काहीजण विरोध करु शकतात. हा ज्याच्या त्याचा अधिकार आहे. मराठा आरक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. जानेवारीत सुनावणी होणार आहे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकावं यासाठी प्रयत्नशील आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने पुण्यात अटल संस्कृती गौरव पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. “पुण्यात अनेक नेते घडले आहेत. कुठेही काही घटना घडली की त्याचं नातं पुण्याशी जोडलं जातं. पुणे सगळ्या अर्थाने प्रगतीचं शहर आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की, पुण्यामध्ये सेटल झालं पाहिज. पण देवेंद्रजी मी पुन्हा कोल्हापूरला जाणार आहे. हे माझ्या विरोधकांना सांगून टाकतो,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

 

First Published on: December 26, 2020 11:38 AM
Exit mobile version