दोन अंकी खासदार नसलेल्यांना पंतप्रधान बनायचेय; मुख्यमंत्र्यांची शरद पवारांवर टीका

दोन अंकी खासदार नसलेल्यांना पंतप्रधान बनायचेय; मुख्यमंत्र्यांची शरद पवारांवर टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , शरद पवार

“सध्या देशात अनेक लोक एकत्रित येत आहेत. त्याचा काहीही परिणाम होणार नाही. एकत्र येणारे नेते आपापल्या भागातले नेते आहेत. त्यापैकीच एक राष्ट्रवादी काँग्रेस. लोकसभेत त्यांना दोन अंकी खासदारांचा आकडा पार करता आला नाही. ते पण पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आहेत. पंतप्रधान पदाची खुर्ची आहे की संगीत खुर्ची हेच कळत नाही”, अशी टीका शरद पवार यांचे नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत भाजपच्यावतीने पक्षाच्या शक्तीकेंद्र प्रमुखांच्या संमेलनात ते बोलत होते.

आपल्या भाषणात ते म्हणाले की, यावेळची निवडणूक ही भाजपसाठी नाही तर भारतासाठी महत्त्वाची आहे. २०१९ मध्ये भारताचे भविष्य नक्की कुठल्या दिशेने जाणार हे ठरविण्याची ही निवडणूक आहे. जर यावेळी जनतेने जर काँग्रेसला सत्ता दिली तर ती ऐतिहासिक चूक होईल आणि भारत आणखी १०० वर्ष मागे जाईल, असेही फडणवीस म्हणाले.

युतीबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभेत मुंबईतील जनता मोदींनाच साथ देईल, असे सांगितले. मात्र मुंबईत भाजप आणि शिवसेनेचे तीन-तीन खासदार असताना युतीचे काय होईल? याबाबत मात्र त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही. युती होणार की नाही? याबाबत मुंख्यमंत्र्यांकडून कोणतेही संकेत मिळाले नसले तरी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मात्र मुंबईतल्या सर्व जागा भाजपाच जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

First Published on: February 12, 2019 8:14 PM
Exit mobile version