कल्याण शिळ मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, रोजच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण

कल्याण शिळ मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, रोजच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण

डोंबिवली (विजय राऊत) – कल्याण डोंबिवलीला रस्ते मार्गाने जोडणारा कल्याण – शिळ (Kalyan Shil way) मार्ग हा अत्यंत महत्वाचा रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्याचे गेल्या दोन अडीच वर्षांपासून सहा पदरीकरण व सिमेंट कॉंक्रीटिकरण करण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. रस्त्यावर वाढलेली वाहने व त्यातच सुररू असलेल्या कामांमुळे वाहतुकीची प्रचंड प्रमाणात कोंडी होत आहे. दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी, वाहनचालक तसेच आजूबाजूचे नागरिक कमालीचे हैराण झाले असून कल्याण शिळ मार्गाने प्रवास नको रे बाबा म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. (Heavy Traffic in kalyan shil road)

हेही वाचा – कल्याण – तळोजा मेट्रो मार्गाच्या कामाला गती द्या, खासदार श्रीकांत शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

१५ वर्षांपूर्वी हा मार्ग दुपदरी होता, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे २००६–०८ मध्ये तत्कालीन कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारने या रस्त्याचे चौपदरीकरण केले. मात्र गेल्या १० – १२ वर्षात कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी भागात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढली. परिणामी वाहनांची संख्या देखील वाढली. त्यामुळे पुन्हा एकदा या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ लागली. त्यामुळे अडीच वर्षांपूर्वी राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारने या रस्त्याचे सहापदरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतले. मात्र कोरोना निर्बंधांमुळे हे काम रखडले होते. सध्या रस्त्याचे काम सुरू असले तरी अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

हेही वाचा ठाण्यात पावसामुळे खड्ड्यात वाढ; आकड्याने गाठला बाराशेचा टप्पा

सहापदरी रस्त्याचे काम सुरू असले तरी आजही अनेक ठिकाणी रस्ता चार पदरीच आहे. तर काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले दिसतात. त्यातच  या रस्त्यावर खिडकाळी, लोढा –पलावा, काटई, कोळे, मानपाडा, सोनारपाडा, दावडी, गोळवली आदी अनेक ठिकाणी जंक्शन आहेत. या सर्वच जंक्शनवर वास्तविक उड्डाणपूल उभारण्याची गरज होती. मात्र काही महत्त्वाच्याच ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. याच रस्त्यावरून तळोजा – कल्याण या मेट्रोचा देखील मार्ग आहे. एकंदरीत या भागात भविष्यात वाढणारी लोकसंख्या व वाहनांची संख्या तसेच या मार्गे कल्याण, तळोजा, पनवेल, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, भिवंडी, कर्जत, नाशिककडे जाणारी वाहने याचा कोणताही विचार करून नियोजन करण्यात आले असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच वाहतूक कोंडी आजही कायम असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – प्रेयसीने कर्ज फेडले नाही म्हणून प्रियकराची आत्महत्या, कळव्यातील धक्कादायक घटना

या रस्त्याने दररोज प्रवास करणाऱ्या कामगार वर्गाला सकाळ – संध्याकाळ या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने अनेक कामगारांना लेट मार्क लागतो. अर्ध्यावरून घरी परतण्याचा मार्ग अवलंबला तरी वाहतूक कोंडीतून बाहेर पडणे अशक्य असते. अर्ध्या – एक तासाच्या प्रवासाला अडीच ते चार तास लागत असल्याचे चित्र आहे. सलग सार्वजनिक सुट्ट्या असतील तेव्हा मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेरगावी जात असतात. त्यादिवशी सकाळपासून या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. परिणामी वाहने एकाच ठिकाणी तासंतास अडकून राहतात. त्यामुळे कल्याण शिळ रोडने प्रवास नको रे बाबा म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

First Published on: August 18, 2022 3:34 PM
Exit mobile version