सरकारी रुग्णालयात औषधांची वानवा, केंद्रीय राज्यमंत्र्यांनीच केली पोलखोल

सरकारी रुग्णालयात औषधांची वानवा, केंद्रीय राज्यमंत्र्यांनीच केली पोलखोल

उस्मानाबाद – राज्यात अनेक रुग्णालयात औषधे उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना बाहेरून औषध खरेदी करावे लागत आहे. यामुळे कमी खर्चात उपचार मिळावे याकरता सरकारी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना औषधासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत असल्याचं समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनीच या घटनेची पोलखोल केली आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1032 अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान, 111 उमेदवारांनाही दिली ग्वाही

केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार उस्मानाबादमधील जिल्हा रुग्णालयात पाहणीकरता गेल्या होत्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षाकडे जाताना त्यांना औषध कक्षापुढे भलीमोठी रांग दिसली. त्यामुळे त्या रांगेतील एका रुग्णाची चिठ्ठी घेऊन त्या रांगेत उभ्या राहिल्या. जवळपास १० मिनिटे रांगेत राहिल्यानंतर त्यांचा नंबर आला. त्यांनी खिडकीतून चिठ्ठी आतील फार्मासिस्टला दिली. मात्र, ही कॅल्शिअमची गोळी रुग्णालयात उपलब्ध नसल्याची माहिती फार्मासिस्टने दिली. तसंच, संबंधित गोळी बाहेरून आणण्याचाही सल्ला देण्यात आला. या प्रसंगामुळे डॉ.भारती पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

रुग्णालयात कॅल्शिअमच्या गोळ्या उपलब्ध नसल्याने डॉ.भारती पवार यांनी यंत्रणेला तत्काळ सूचना दिल्या. औषधांची व्यवस्था सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडून करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – १११ उमेदवारांच्या ईडब्ल्यूएस नियुक्तीस हायकोर्टाची स्थगिती

जिल्हा सामान्य रुग्णालय मेडिकल कॉलेजकडे वर्ग झाले आहे. मात्र, मान्यता मिळून एकच महिना झाला. यामुळे अद्याप बरेचसे हेड तयार न झाल्यामुळे निधीची अडचण आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, अशी प्रतिक्रिया रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.उज्ज्वला गवळी यांनी दिली.

First Published on: December 2, 2022 7:56 AM
Exit mobile version