कोरोना काळात मागील दोन वर्ष दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आली होती. मात्र यंदा विद्यार्थ्यांची परीक्षा प्रत्यक्षपणे होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज दाखल केला नाही. या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभाग आणि बोर्डाकडून दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना १४ मार्चपर्यंत तर बारावीच्या विद्यार्थ्यांना ३ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत दिली आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत उत्तर देताना विद्यार्थ्यांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, गेल्या वर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या १३ लाख १९ हजार ७५४ होती ती या वर्षी संख्या वाढून १४ लाख ३१ हजार ७६७ झाली आहे. शिक्षण शास्त्र या विषयाला परवानगी दिली आहे. कारण विद्यार्थी अभ्यास करत आहेत. त्यांचे कुठेही नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
अर्ज विलंब शुल्क आकारणार नाही
विद्यार्थ्यांचे अर्ज भरले गेले आहेत. सगळ्यांचे म्हणणे आहे की, विलंब शुल्क आकारले जाऊ नये यासाठी बोर्डाशी चर्चा केली आहे. परीक्षासंदर्भात सर्व निर्णय बोर्ड घेत असते त्यांच्याशी शासन म्हणून आम्ही चर्चा करत असतो निर्णय बोर्ड घेत असते. अर्जाला विलंब झाल्यास त्याचे शुल्क घेऊ नये यासाठी बोर्डाशी चर्चा केली आहे. बोर्डकडून कोणतेही विलंब शुल्क आकारले जाणार नाही अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. काही ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या अडचणी येत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
तांत्रिक अडचणीला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा
फॉर्म भरण्यास अडथळे येत असल्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ४ मार्च २०२२ रोजी आहे. परंतु त्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ३ मार्च २०२२ पर्यंत मुभा देण्यात आली आहे. तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १५ मार्च २०२२ रोजी होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी १४ मार्च २०२२ पर्यंत मुभा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
हेही वाचा : विधानपरिषदेत शेतकऱ्यांना चोर म्हटल्यामुळे विरोधकांचा सभात्याग