औरंगाबाद विमानतळाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’

औरंगाबाद विमानतळाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’

औरंगाबाद विमानतळाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे नामकरण करण्यात आले आहे. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, असे झाले आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूक जवळ आली असून त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरवातीपासूनच औरंगाबाद विमानतळाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करावे अशी मागणी शिवसेनेने लावून धरली होती आणि आज अखेर शिवसेनेच्या मागणीवर शिक्कामोर्तब झाला असून याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली.

याच धर्तीवर घेण्यात आला निर्णय

‘विमानतळाचे नामांतर करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी होत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेने देखील ‘धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ’, असे नाव करण्याबाबत ठराव संमत केला आहे. तसेच लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावास मान्यता दिली असून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येईल. यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, मुंबई असे करण्यात आले आहे तर कोल्हापूर विमानतळाचे नाव ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’, कोल्हापूर असे करण्यात आले आहे. याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला’ आहे.


हेही वाचा – धक्कादायक: राज्यात रोज ३० मुलांचे अपहरण त्यात ७२ टक्के मुली


 

First Published on: March 5, 2020 7:27 PM
Exit mobile version