मराठा आरक्षण: न सांगता इतकी गर्दी जमली, सांगून बघू का? संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

मराठा आरक्षण: न सांगता इतकी गर्दी जमली, सांगून बघू का? संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज राज्य सरकारला इशारा दिला. मराठा समाजाने केलेल्या इतर मागण्यांविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठविलेले पत्र आणि त्या पत्रास समाजाच्यावतीने पाठविलेल्या प्रतिउत्तरांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रावर नाराजी व्यक्त केली.

राज्य सरकारने पाठवलेलं पत्र अधिकाऱ्यांनी लिहून पाठवलं आहे. फक्त पाठवायचं म्हणून हे लेखी उत्तर पाठवलं आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील याची पुरेशी दखल घेतली नाही, अशी खंत व्यक्त केली. तसंच, काही दिवसांपूर्वी नांदेडमधील सभेवेळी झालेल्या गर्दीवरुन संभाजीराजेंनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. आवाज उठवायचा म्हटला, तर मी करू शकतो. आम्ही न बोलवता किंवा सांगता देखील नांदेडला ५० ते ७० हजार लोक हजर होते. रायगडसारख्या ठिकाणी आम्ही सुरुवात करू. जर सरकार दखल घेत नसेल आणि आम्ही करायचच असेल तर करू शकतो. नांदेड ही फक्त एक झलक होती. तीही न सांगता. सांगून बघू का? मग बघा, असा इशारा संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिला.

संभाजीराजे यांनी पुढे बोलताना आमची परीक्षा घेऊ नका, असा देखील इशारा दिला. सरकारनं ठरवावं, तेव्हा बैठकीला बसायची आमची तयारी आहे. पण सरकारची तयारी नसेल, तर रायगडावर बसून आमची मूक आंदोलनाची तयारी आहे. मग नांदेडला जशी गर्दी जमली, तशी गर्दी जमली तर मी जबाबदार राहणार नाही. हे चालेल का सरकारला? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला आहे.

अण्‍णासाहेब पाटील महामंडळाचा निधी वाढवा

अण्‍णासाहेब पाटील महामंडळाच्‍या माध्‍यमातून १८८५ कोटींचा निधी मागील सरकारनेच वाटप केला आहे. आताच्‍या सरकारने केवळ साडेबारा कोंटीचे वाटप केले आहे. राज्‍य सरकारने अण्‍णासाहेब पाटील महामंडळाच्‍या निधीमध्‍ये वाढ करण्‍यात यावी, अशी मागणीही संभाजीराजेंनी केली.

 

First Published on: September 8, 2021 1:37 PM
Exit mobile version