काँग्रेसने ज्यांना जमीन राखायला दिली त्यांनीच डल्ला मारला; नाना पटोलेंचा पवारांवर पलटवार

काँग्रेसने ज्यांना जमीन राखायला दिली त्यांनीच डल्ला मारला; नाना पटोलेंचा पवारांवर पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेसच्या (Congress) सद्यस्थितीवर भाष्य करताना आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशमधील एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे, असं परखड मत व्यक्त केलं आहे. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला आहे. काँग्रेसने ज्यांना जमीन राखायला दिली त्यांनीच त्यावर डल्ला मारला, असं जोरदार प्रत्युत्तर नाना पटोले यांनी पवारांना दिलं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नाना पटोले यांनी पवारांवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला.

काँग्रेसने अनेकांना जमीन राखायला दिली. ज्यांना राखण्यासाठी जमीन दिली त्यांनीच डल्ला मारला आणि यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असेल, असं शरद पवार यांना म्हणायचं असेल, असा टोला नाना पचोले यांनी पवारांना लगावला. पवारांच्या वक्तव्याबाबत नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच, २०२४ मध्ये काँग्रेसचाच पंतप्रधान बनणार! कुणाला काय बोलायचं त्याचं लोकशाहीत स्वातंत्र्य आहे, असं पटोले म्हणाले.

नाना पटोले एवढ्यावर न थांबता पुढे बोलताना इशारा देखील दिला. काँग्रेस जमीनदारांचा पक्ष नाही आणि काँग्रेसनं जमीनदारी केली नाही. ज्यांना काँग्रेसने शक्ती दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला, असं नाना पटोले म्हणाले. पुढे त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे आणि ते आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा देखील नाना पटोले यांनी दिला. २०२४ मध्ये काँग्रेसच देशाचं नेतृत्व करेल, असा विश्वासही पटोले यांनी यावेळी व्यक्त केलाय. शरद पवार यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली नाही. जमिनदारांचं उदाहरण दिलंय, असंही पटोले म्हणाले.


हेही वाचा – काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशच्या जमीनदारासारखी – शरद पवार

शरद पवारांनी काँग्रेसचं करेक्ट वर्णन केलंय; फडणवीसांचा खोचक शब्दात निशाणा


 

First Published on: September 10, 2021 2:56 PM
Exit mobile version