समस्त हिंदूंचा अपमान झाला आहे. आता वेळ आली आहे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडण्याची, शिवसैनिक करणार नसतील तर मी शिंपडणार असल्याचे वक्तव्य भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. १९९३ च्या दंगलीत सहभागी असणाऱ्यांसोबत संबंध असल्याचे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांवर केले आहेत. यावरुन नितेश राणे यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी रियाज भाटी हा दाऊदचा माणूस असल्याचे म्हटले आहे. परंतु रियाज भाटी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. नितेश राणे यांनी रियाज भाटीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचा फोटो ट्विट करुन हे काय चाललं आहे असा सवाल केला आहे.
नितेश राणे यांनी आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये मी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडणार असल्याचे सांगितले आहे. या व्हिडिओत नितेश राणे म्हणाले, सर्वांना माहिती आहे की, १९९३ च्या दंगलीनंतर हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील हिंदूंना वाचवले त्यावेळी नवा इतिहास रचला गेला. इतक्या वर्षानंतर त्यांचाच मुलगा ९३ च्या दंगलीतील जे मुख्य आरोपी आहेत त्यांचे व्यावसायिक पार्टनर आहेत. त्यांच्याच मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसले आहेत. मला वाटत आता खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली आहे. हा समस्त हिंदूंचा अपमान आहे. शिवसैनिक आता स्मृती स्थळावर जाऊन गोमूत्र शिंपडणार का? ते शिंपडणार नसतील तर हे महान कार्य मीच येणाऱ्या दिवसांत शिंपडणार असं नितेश राणे म्हणाले.
— nitesh rane (@NiteshNRane) November 10, 2021
राणेंनी दर्शन घेतल्यावर स्मृतीस्थळावर शिंपडले होते गोमूत्र
केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊन आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली होती. राणेंनी स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊन जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केल्यानंतर परळमध्ये नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. याचे पडसाद राज्यभरात उमटले होते. तसेच शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दुग्धाभिषेकानं शुद्धीकरण केलं. तसेच स्मृतीस्थळाच्या परिसरात गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं होते. शिवसैनिकांनी केलेल्या शुद्धीकरणावरुन राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती.
हेही वाचा : हर्बल तंबाकू सप्लाय बंद झाल्याने मलिकांचे मानसिक संतुलन बिघडलं, आशिष शेलारांचा पलटवार