शिवसेना फोडण्यामागे शरद पवार असल्याचे सांगणाऱ्या केसरकरांना अजितदादांचा प्रेमाचा सल्ला

शिवसेना फोडण्यामागे शरद पवार असल्याचे सांगणाऱ्या केसरकरांना अजितदादांचा प्रेमाचा सल्ला

एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी बंडळी पुकारली होती. जवळपास ५० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड पुकारला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा तेव्हा त्यामागे शरद पवार असल्याचा गंभीर आरोप केला. यावर आता राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “दीपक केसरकर यांना आम्हीच तिकीट देऊन आमदार केले होते. ते आमचे एकेकाळचे सहकारी आहेत. त्यांनी माहिती घेऊन बोलावे असा माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे”, असे प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिले. (oppotion party leader ajit pawar slams deepak kesarkar)

गुरुवारी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोतलाता अजित पवार यांनी दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले. “दीपक केसरकर १९९२ मध्ये फार ज्युनियर होते. त्यावेळी ते आमच्याच पक्षात होते. आता केसरकर शिंदे गटाचे प्रवक्ते झाले. त्यांनी अशाप्रकारची वक्तव्ये करताना फार विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक केली पाहिजेत. प्रवक्त म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला असे करू नये. बारकाईने माहिती घ्यावी. माझ्या माहितीप्रमाणे १९९२ ला पहिल्यांदा शिवसेना फुटली तेव्हा शरद पवार महाराष्ट्रात नव्हते. ते केंद्रात संरक्षण मंत्री होते. तेव्हा सुधाकर नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा शिवसेना मंडल आयोगाच्या निमित्ताने फुटली. शिवसेनेने मंडल आयोगाच्या अंमलबजावणीबाबत वेगळी भूमिका घेतली. ती भूमिका छगन भुजबळ व इतर १८ सहकाऱ्यांना पटली नाही. म्हणून ते बाहेर पडले. दुसऱ्याच्या नावावर पावती फाडण्याचं कारण नाही”, असे अजित पवार यांनी व्यक्त केले.

“केंद्रीय मंत्री नारायण राणे बाहेर पडले तेव्हाही असेच घडले होते. नारायण राणे व शिवसेनेतील नेतृत्वाचे जमत नव्हते. खटके उडत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते. परंतू त्याने नारायण राणे यांचं समाधान झालं नाही. म्हणून त्यांनी टोकाची भूमिका घेत शिवसेना सोडली. त्यात दुसऱ्यांनी फोडाफोड करण्याचं काहीच कारण नाही. तेव्हाही शरद पवार महाराष्ट्रात नव्हते. ते केंद्रात कृषीमंत्री होते. तेव्हा नारायण राणे बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये गेले”, असेही अजित पवार यांनी म्हटले.


हेही वाचा – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मुख्यमंत्र्याचे पूरस्थितीवर लक्ष

First Published on: July 15, 2022 9:23 AM
Exit mobile version