Pegasus Spyware : नाना पटोलेंचे फोन टॅप झाले होते; थोरात यांचा आरोप

Pegasus Spyware : नाना पटोलेंचे फोन टॅप झाले होते; थोरात यांचा आरोप

नाना पटोलेंचे फोन टॅप झाले होते; थोरात यांचा आरोप

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे फोन टॅप झाल्याचा दावा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. पेगासस स्पायवेअर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देशातील पत्रकार आणि राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा दावा ‘द वायर’सह इतर काही मीडिया संस्थांनी केला. त्यानंतर आता त्याचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उमटत आहेत. या प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी फोन टॅपिग प्रकरणी मोठा आरोप केला आहे. “नाना पटोले यांचेही फोन २०१७-१८ मध्ये टॅप झाले होते. आता जे प्रकरण देशपातळीवर समोर येतंय ते गंभीर आहे. कारण यामुळे आपल्या देशातील महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती शत्रू देशांकडेही जाऊ शकते,” असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

राज्यपालांनी १२ आमदारांची नियुक्ती तातडीने करावी

राज्यपाल नियुक्ती १२ आमदारांची अद्याप नियुक्ती झालेली नाही. यावरुन बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. १२ आमदारांबाबत राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. राज्यातील लोकांच्या मूलभूत हक्कावर गदा आहे. कारण महाराष्ट्रातील प्रश्न या १२ आमदारांमार्फत सभागृहात मांडले गेले असते, ते सोडवले गेले असते. याबाबत उच्च न्यायालयाच्या पुढे विषय चालू आहे. पण न्यायालयात जाण्याची वेळ येणं हेही दुर्दैव आहे. माननीय राज्यपालांना हा निर्णय लवकर देणे उचित राहील, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

हा तर मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा डाव

“२०१४ नंतर मुंबईतील अनेक महत्त्वाच्या गोष्टी गुजरातला कशा नेता येतील हा प्रयत्न सुरू आहे. असं केल्याने मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही,” असं म्हणत थोरात उद्योगांसाठी अजूनही महाराष्ट्राचं आकर्षण आहे, असं सांगितलं. राज्यातील वातावरण, सुरक्षितता, यामुळे उद्योग आपल्याकडे येतात, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

 

First Published on: July 20, 2021 1:33 PM
Exit mobile version