सदानंद कदमांच्या अटकेवर रामदास कदमांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सदानंद कदमांच्या अटकेवर रामदास कदमांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

साई रिसॉर्ट (Sai Resort case) गैरव्यवहार प्रकरणी सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना अटक झाली आहे. यावर सदानंद कदम यांचे बंधू शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम (Ramdas kadam) यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. सदानंद कदम यांना सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) (Enforcement Directorate) कारवाईत अडकवण्यामागे माझा हात, पाय आणि डोकेही नाही. मी समोरासमोर अंगावर जातो. पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत नाही. ईडीने जर माझे ऐकले असते तर मी अनिल परबांनाच (Anil Parab) तुरुंगात टाकण्यास सांगितले असते. अनिल परबांनी माझ्या मुलाला – आमदार योगेश कदम यांना खूप त्रास दिला आहे. त्यांना राजकारणातून उद्धवस्त करण्याचे सर्व प्रयत्न केले गेले. असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

दापोली येथील साई रिसॉर्ट गैरव्यवहार प्रकरणी ईडीने सदानंद कमद यांना अटक केली आहे. त्यांना १५ मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. या अटकेमागे रामदास कदम असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर रामदास कदम प्रथमच माध्यमांसमोर आले आहेत. ते म्हणाले, ‘सदानंद कदम यांना अनिल परब यांनीच फसवलं आहे. परब हे स्वतः वकील आहेत. त्यांनी कागदपत्रे ही सदानंद यांच्या नावे केली. मात्र रिसॉर्टच्या परवानगीचा अर्ज आणि लाईटबील हे अनिल परबांच्या नावावर आहे. यात सदानंद कदम यांना जाणीवपूर्वक फसवलं जात आहे. बळीचा बकरा केलं गेलं आहे. त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नसेल तर ते निश्चित यातून बाहेर येतील.’ असंही कदम म्हणाले. साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांची चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी रामदास कदम यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या खेड येथे झालेल्या सभेला १९ तारखेला उत्तर देणार असल्याचे कदम यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले. कोकणातील शिवसैनिक हा एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्या पाठीशी असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?
दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अनिल परबांवर शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याचा आरोप आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात फसवणूक करत बनावट कागदपत्रांच्या आधारे एक रिसॉर्ट बांधल्याचा आरोप होत आहे. 2017 मध्ये अनिल परब यांनी या रिसॉर्टसाठी भूखंड विकत घेतला आणि कोरोनादरम्यान लॉकडाऊनच्या काळात या शेतीच्या भूखंडावर रिसॉर्ट बांधण्याचे काम केले.

मिळालेल्या माहितीनुसार, जमीन खरेदी केल्यानंतर दोन वर्षांनी 2019 मध्ये याची नोंदणी झाली आणि त्यानंतर 2020 मध्ये ही जमीन मुंबईतील केबल ऑपरेटर आणि शिवसेनेचे माजी खासदार रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ही जमीन 1.10 कोटींना विकण्यात आली. दरम्यान किरीट सोमय्यांकडून हे रिसॉर्ट पाडण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या मते रिसॉर्टच्या बांधकामातून पर्यावरण नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे परब यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : साई रिसॉर्ट : अनिल परबांनंतर आता अधिकाऱ्यांच्या चौकशीची सोमय्यांची मागणी

First Published on: March 14, 2023 8:35 PM
Exit mobile version