“त्याबद्दल मला खेद वाटतो…” अजित पवारांच्या विधानावरून संजय राऊत नरमले

“त्याबद्दल मला खेद वाटतो…” अजित पवारांच्या विधानावरून संजय राऊत नरमले

अजित पवारांविषयी मला अर्धवट माहिती देण्यात आली. त्यामुळे मी त्यांच्या वक्तव्यावर कडक शब्दात उत्तर दिले. मला त्याचा खेद वाटतो, असा नरमाईचा सूर आता संजय राऊत यांच्याकडून लावण्यात आला आहे.

अजित पवारांविषयी मला अर्धवट माहिती देण्यात आली. त्यामुळे मी त्यांच्या वक्तव्यावर कडक शब्दात उत्तर दिले. मला त्याचा खेद वाटतो, असा नरमाईचा सूर आता संजय राऊत यांच्याकडून लावण्यात आला आहे. राजकीय नेत्यांनी बोलताना कसे बोलावे, या मुद्द्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरु होते. पण याबाबत आज (ता. 04 जून) सकाळी अजित पवार यांनी देखील नरमाई घेतल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत हे मोठे नेते आहेत, असे वक्तव्य आज अजित पवारांनी केले. त्यानंतर काही वेळातच नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी अजित पवारांच्याबाबत आपले मत बदलल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा – “..तर लोकांचा मविआवर विश्वास राहणार नाही”, छगन भुजबळांचा नेत्यांना सल्ला

प्रसार माध्यमांशी अजित पवारांच्या प्रश्नाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मला अजित पवारांविषयी अर्धवट माहिती देऊन प्रश्न विचारला गेला. अजित पवारांनी तुमच्याविषयी असं असं बोलले, ते असं बोलले नाहीत. माझा आणि अजित पवारांचा स्वभाव स्पष्ट बोलण्याचा असल्याने आम्ही पटकन बोलून जातो. अजित पवार म्हणाले होते की महाराष्ट्रात संयमाने वागलं पाहिजे. त्यांचं म्हणणं योग्य आहे मी सहमत आहे. अजित पवार असंही म्हणाले की थुंकण्यासंदर्भात संजय राऊत यांनी खुलासा दिला. मात्र मला वेगळा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मी कडक शब्दात उत्तर दिलं. मला त्याचा खेद वाटतो आहे.”

शुक्रवारी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार संजय शिरसाट यांचे नाव घेताच थुंकण्याची ॲक्शन केली. त्यांनंतर राज्यातील अनेक राजकारण्यांनी याबाबद्दल संताप व्यक्त केला. तर पक्षाच्या नेत्यांनी तार्तम्य बाळगावे आणि आपले मत व्यक्त करावे, असे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले. अजित पवारांच्या या मताला प्रतित्युत्तर देत संजय राऊत म्हणाले की, धरणामध्ये xxxपेक्षा थुंकणं चांगलं अशी खालच्या पातळीवर टीका केली. त्यामुळे या टीकेवरून या दोघांमध्ये पुन्हा शीतयुद्ध सुरु होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

तर गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये कुरबूरी सुरु असल्याने मविआचे नेते छगन भुजबळ यांनी नेत्यांना सल्ला दिला आहे. “बोलताना एकमेकांच्या विरोधात शेरेबाजी करणे टाळले पाहिजे. जर आपल्याला एकत्रित लढायचं आहे तर आपल्यामध्येच अशा प्रकारची फूट आहे, असे जनतेमध्ये त्याचा प्रचार-प्रसार झाला, तर आपल्या महाविकास आगाडीच्या एकजुटीवर वज्रमुठीवर लोकांचा विश्वास राहणार नाही. त्यामुळे मविआच्या सर्वच नेत्यांनी सांभाळून बोलावे,” असा सल्ला प्रसार माध्यमांच्या माध्यमातून छगन भुजबळ यांनी दिला आहे.

First Published on: June 4, 2023 12:43 PM
Exit mobile version