शरद पवार यांनी त्यांच्या पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात यावर्षातील सर्वात मोठी घडामोड घडली. पण या निर्णयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. तर काही कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहित पवारांनी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पवार निर्णय घेणार असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगण्यात आले आहे. अनेक पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा पवार योग्य निर्णय घेतील, असे मत व्यक्त केले आहे. तर शरद पवारांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले असून हा निर्णय देऊन अजित पवार यांना चपराक लगावली असल्याचे मत शिवसेना (शिंदे गट) नेता रामदास कदम यांनी व्यक्त केले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना कदम यांनी असे विधान केले.
हेही वाचा – पोलिसांच्या क्रूरतेचा तीव्र शब्दांत निषेध; शरद पवारांनी लक्ष घालण्याचे गृहमंत्र्यांना केले आवाहन
यावेळी बोलताना रामदास कदम म्हणाले की, एका दगडात दोन पक्षी मारण्याचे काम पवारसाहेबांनी केले आहे. त्यांनी दाखवून दिले की राष्ट्रवादीची देशातील, महाराष्ट्रातील जनता ही माझ्यासोबत आहे. अजितदादा तुमच्यासोबत नाहीत. अजित दादांना त्यांनी या माध्यमातून उघडं पाडल आहे. एकाकी पाडलं आहे. मधल्या काळात अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. काही आमदारांच्या भेटीगाठी सुद्धा सुरू होत्या. त्यामुळे या गोष्टींमुळे शरद पवारांनी अजित पवारांना दाखवून दिले की, पक्ष माझा आहे. तुझा नाही. त्यामुळे पवारांनी या माध्यमातून अजित पवारांना चपराक लावली आहे, असेही रामदास कदम म्हणाले.
कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूत…
शनिवारी (ता. 06 मे) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बारसू गावातील ग्रामस्थांची भेट घेणार आहेत. पण गावातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी ते बारसूला येणार असल्याचा घणाघात रामदास कदम यांनी केला आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी स्वतः बारसूची जागा प्रकल्पासासाठी सूचविली होती. याबाबतचे पत्र पण त्यांनी पंतप्रधान मोदींना पाठवले होते. त्यामुळे मुख्यमंत्री असताना एक भूमिका आणि पद गेल्यानंतर दुसरी भूमिका घेणे म्हणजे पाऊस आल्यावर सरडा जसा रंग बदलतो, अगदी त्याप्रमाणे असल्याचे सांगत कदमांनी ठाकरेंवर टीका केली.